पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते पवमान पूजा करण्यात आली. सकाळी 10 ते 12 हभप अवधूत महाराज चोपदार यांचे काल्याचे कीर्तन झाले. मंदिरात अतिशय सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी एकच्या सुमारास मोजक्या बृह्मवृंदांच्या उपस्थित संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर अतिशय सुंदर डोळ्याचे पारणे फिटेल अशी पूजा आणि सजावट करण्यात आली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक आणि शितोळे सरकार यांच गाभाऱ्यात आगमन झाल्यानंतर आरती होऊन ऍड. विकास ढगे पाटील आणि पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई यांनी माउलींच्या चल पादुका पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर-पवार यांच्याकडे सोपविल्या. त्यानंतर आरफळकर-पवार यांनी चल पादुका घेऊन विणा मंडपात आले येथे आकर्षक फुलांनी सजवलेल्या चौरंगावर त्या पादुका विराजमान केल्यानंतर देव संस्थानमार्फत संस्थानच्या सर्व मानकऱ्यांना पागोटे आणि नारळ तर पालखी सोहळा मालक यांच्या हस्ते उपस्थित विश्वस्त मंडळ, मानकरी, दिंडीप्रमुख यांना नारळ वाटप करण्यात आले.
माउलींची आरती सुरू झाली त्यानंतर माउलींची पालखी समस्त आळंदीकर युवक “माउली, माउली’चा जयघोष करीत खांद्यावर घेत असतात; परंतु यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पालखीमध्ये चल पादुका न ठेवता पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफाळकर यांनी पादुका हातात घेऊन मंदिरात ज्ञानोबा माऊलीच्या हरिनामाच्या गजरात प्रदक्षिणा पार पडली. पश्चिम दरवाजातून पादुका आजोळघरी आणल्यानंतर गांधी परिवाराच्या वतीने आरती होऊन पालखी सोहळा विसावला. तर आता दशमीपर्यंत माउलींच्या चल पादुका तेथेच वास्तव्यास असणार आहेत. दशमीला हेलिकॉप्टर किंवा उपलब्ध वाहनातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे पुढील 17 दिवस आजोळ घरात संत ज्ञानेश्व महाराज पालखी समोर नित्योपचार, कीर्तन, जागर मोजक्याच लोकांमध्ये होणार आहे.
प्रस्थानाप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे, विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, शांतीब्रह्म हभप मारुती महाराज कुऱ्हेकर, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, श्रींचे चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी राहुल चिताळकर, योगिराज कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, योगेश आरू, डी. डी. भोसले पाटील, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधर आदी मान्यवर उपस्थित होते. तर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इतिहासात प्रथमच अनुभवले
वर्षानुवर्षे चालत आलेल्या अखंड पायी वारी सोहळा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सोहळ्याच्या दोन-तीन दिवस अगोदरपासून आळंदीत फुलणारे भक्तीचे मळे यंदा फुलले नाही. तर मंदिर परिसर बफर झोन घोषित आहे. त्यामुळे दुकानेही उघडले नसल्याने नक्की आज माउलींचे प्रस्थान आहे की नाही, असा प्रश्न पडला होता. तर मंदिरही दि. 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले असून इतिहासात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आळंदीकरांनी अनुभवले.