दौंड- दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राजाराम तांबे यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपामध्ये प्रवेश केल्याने दौंड राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर हादरा बसला आहे.
राजाराम तांबे यांनी दौंड तालुक्यातून 2014 ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्मान सेना (मनसे)कडून लढवली होती.तरुणांच्या साथीने त्यांनी सुमारे 17 हजार मते घेतली. यामुळे कुल-थोरात यांच्या भोवती केंद्रीत असलेल्या तालुक्यात तिसरा पर्याय निर्माण होत असताना निवडणुकीनंतर तांबे यांनी लगेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला.
साडेचार वर्ष केवळ नावाला ते राष्ट्रवादीत होते. पक्षाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात त्यांची उपस्थिती नव्हती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तांबे यांनी भाजप प्रवेश केल्याने दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत तांबे म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा न्याय राष्ट्रवादी कॉंग्रेस ने मागील चार वर्षांत देऊ शकले नाही. मागील पाच वर्षांमध्ये तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी जे भरीव काम या तालुक्यात उभे केले आहे त्याचा विचार करून मी व माझ्या कार्यकर्त्यांनी कुल यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.