न्हावरे(प्रतिनिधी) :– शिरुर तालुक्यातील न्हावरे गावच्या तीन हिरकणी करोनाच्या लढाईत आरोग्य सेवेचे व्रत हाती घेऊन करोना रुग्णांची सेवा करत आहेत. संपूर्ण जगात करोनाचा कहर सुरु असताना प्रशासन, डॉक्टर, पोलीस यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे जीवाची बाजी लावून अहोरात्र कशाचीही पर्वा न करता देशसेवा करत आहेत.
अशाच प्रकारे शिरुर तालुक्यातील न्हावरे गावच्या असणाऱ्या उषा गारगोटे या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयसीयु इन्चार्ज म्हणुन कार्यरत आहेत. या ठिकाणी त्या करोना बाधित व्यक्तींची काळजी घेत आहेत. तर तेजश्री गिरीष कोरेकर या माजी सैनिक लक्ष्मण निळकंठ कोरेकर यांच्या स्नुषा असुन त्या काशिबाई नवले मेडिकल हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणुन काम करत आहेत. कोरोनाच्या लढ्यात कोविड इमर्जन्सी सेवेत त्या कार्यरत असल्याने त्यांचा तीन वर्षांचा मुलगा वेदांश याला आजी आजोबांकडे सांभाळायला ठेवले असुन, त्या करोना लढाईत महत्वाची भुमिका पार पाडत आहेत.
त्याचप्रमाणे शर्मिला साठे-धुमाळ ह्या ससुन रुग्णालयात १९९३ पासुन कार्यरत आहेत. त्या बी.जे.वैद्यकिय महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन काम पाहतात.सध्या त्या करोनाच्या लढ्यात परिचारिका संवर्गाची व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच करोनाशी थेट संपर्क असणाऱ्या नर्सेसना प्रशिक्षण देतात. त्याचप्रमाणे ससुन मधील नर्सेस कोविडमध्ये ड्युटी बजावत असताना आणि त्यानंतर क्वारंटाईन काळात हॉटेलमध्ये राहत असताना त्यांच्या जेवण आणि राहण्याची पुर्ण जबाबदारी त्या सांभाळत आहेत. दोन महिन्यांपासुन त्यांनी ६ वर्षांची मुलगी ऋतुजा हिस आईकडे ठेवुन त्या कर्तव्य बजावत असुन, मुलीच्या वाढदिवसालाही जाता आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. मात्र, रुग्ण सेवेतून देशसेवा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन मध्ये आपल्या कामातून देशसेवेला महत्त्व देणाऱ्या न्हावरे गावच्या तीनही कन्या आपली लहान मुले दुर ठेवुन करोनाशी लढत आहेत. करोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणारे सगळेच प्राण पणाला लावून काम करत आहेत. मात्र न्हावरे गावाच्या तीनही हिरकणी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यापेक्षा जास्त आरोग्य सेवेचे कार्य करत असून, करोना लढाईत पुर्णपणे सज्ज होउन त्या लढ़ाईत उतरल्या आहेत.
तसेच सेवा बजावत असताना प्रोटेक्टिव किट अंगावर चढवणे व उतरवणे याला एक सिस्टीम आहे. या प्रक्रियेला साधारण १५ ते २० मिनिटे लागतात.त्यामुळे एकदा हे किट घातले कि ६ ते ७ तास दिवसा व रात्रपाळीत ८ ते १० तास काढता येत नाही. या दरम्यानच्या काळात त्यांना पाणी पिणे किंवा नैसर्गिक विधीला सुद्धा जाता येत नाही. सध्या उन्हाळा चालू आहे. त्यामुळे अशा प्रतिकुल परिस्थितीतही करोनाशी दोन हात करणाऱ्या या योद्धयांचे काय हाल होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.