रात्रीतून पायी निघाले होते गावी : महसूल व पोलिसांची पळापळ
शिरूर- रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारेगाव, रांजणगाव, ढोकसांगवी परिसरातील 700 ते 800 परप्रांतीय कामगारांनी रविवारी (दि. 3) रात्री पायी आपल्या गावी निघाले होते. मात्र, शिरूर जवळ पोलिसांनी त्यांना अटकाव करून थांबवले. दरम्यान, एकदमच एवढे मजूर रस्त्यावर आल्यामुळे पोलीस महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. त्यांना थांबवण्यासाठी प्रशासनाची दमछाक झाली. कामगार थांबण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलीस प्रशासनाने अधिकची कुमक मागून या सर्व नागरिकांना याठिकाणी थांबवले. यात काही महिलांचाही आणि लहान मुलांचाही समावेश होता. तर आमदार आशोक पवार यांनी मध्यरात्री दीड वाजता या कामगारांशी फोनद्वारे संवाद साधून त्यांना घरी जाण्यासाठी सर्वोतोपरी मदती केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कामगार शांत झाले.
शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मयूर लॉन्स तर्डोबाचिवाडी, न्हावरे फाटा येथील मंगल कार्यालयात यातील जवळपास 450 कामगारांची राहण्याची व्यवस्था केली तर उरलेले कामगार ते राहत असलेल्या कारेगाव, ढोकसांगवी या परिसरात पुन्हा पाठवण्यात आले. रात्री या कामगारांच्या भेटीला बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना व दौंड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सोमवारी (दि. 4) सकाळीच आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांनी या कामगारांची भेट घेतली.
प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले की, सर्व परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षित पाठवण्याची जबाबदारी आमची आहे, त्यामुळे कामगारांनी घाबरून न जाता प्रशासनावर विश्वास ठेवून सोशल डिस्टन्स राखून याठिकाणी थांबणे गरजेचे आहे. त्यांना लागणारे सर्व सोयी-सुविधा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही देणार असल्याची ग्वाही दिली.
- या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मध्यप्रदेश व यूपीमध्ये सोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले असून यातील मध्यप्रदेशातील कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी त्यांच्या राज्याकडून होकार मिळाला आहे; मात्र उत्तर प्रदेश येथील सरकारने जे कामगार त्यांच्या राज्यात येणार आहे त्यांची कोविड चाचणी करून त्यांना पाठवावे अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश येथील कामगारांसाठी लवकरच स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली जाणार असून त्यांना पाठवण्यात येणार आहे तर यूपीच्याही नागरिकांना त्यांच्या भागात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– अशोक पवार, आमदार, शिरूर हवेली - महसूल विभागाच्या वतीने तलाठी मंडलाधिकारी महसूल कर्मचारी यांच्यामार्फत परप्रांतीय कामगारांची जिल्हानिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू असून, यादीप्रमाणे त्यांची माहिती गोळा करीत असून त्यांची आरोग्य ही तपासणी करण्याचे काम सुरू आहे. या कामगारांच्या राहण्याची जेवणाचीची सर्व तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
– लैला शेख, तहसीलदार शिरूर