राजगुरूनगर (प्रतिनिधी) – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने वेळीच दक्षता घ्यावी, अशी मागणी रिपाइंचे पुणे जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी केली आहे.
खेड तालुक्यातील विशेषकरून पश्चिम भागातील असंख्य लोक रोजगाराच्या निमित्ताने मुंबई शहरात अडकून पडलेले आहेत. मुंबई शहर कोविड 19 या संसर्गजन्य आजारामुळे रेड झोनमध्ये आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये वाढत चालले आहेत.
खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा रायगड जिल्ह्याला लागून असून दोन्ही बाजूला जाण्या-येणासाठी पायवाट आहे. या मार्गाने अनेक लोक करोनाची तपासणी न करता रात्री अपरात्री पायपीट करून आपापल्या घरी परतत आहे. ही बाब खेड भागात करोना आजाराला पसरण्यासाठी मदत करणारी आहे. अशा चोरून येणाऱ्या लोकांचा वेळीच शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात यावी. त्या चोर मार्गावर पोलीस, डॉक्टरांचे तपासणी पथक नेमावे अन्यथा करोना रुग्णांची झपाट्याने वाढ होऊन परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जाईल, असे डोळस यांनी म्हटले आहे.