कामशेत – ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दिवाळीच्या सणातच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीची तयारी करीत असताना अनेक महिलांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळात दिवाळीची सध्या जोरदार तयारी महिला वर्ग करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामशेतमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे.
नाणे मावळमध्ये सुमारे 50 ते 60 छोट्या वाड्या व वस्त्या आहेत. येथीलही वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसातून किमान दहा ते पंधरा वेळा वीज खंडित होते. परिणामी विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होत असून, नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामशेतकरांची मागणी आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक बचत गटांनी दिवाळी फराळाची ऑर्डर घेतली असून दिवसा घरी फराळ तयार करून रात्री उशिरापर्यंत बचत गटांचे फराळ तयार करण्यात येत आहे. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच विजेचा लपंडाव सुरू आहे. कामशेतमधील बंगला कॉलनी व माउलीनगर भागात वीजपुरवठा तब्बल दोन ते अडीच तास खंडित झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला.
ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच वीजपुरवठा खंडित होत असल्याने आनंदावर विरजण पडत आहेत. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अनेक घरगुती उपकरणेदेखील खराब होत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. दर गुरुवारी वीजपुरवठा खंडित होत असतो, त्याचे कारण देखभालीसाठी वीज बंद आहे. असे दिले जाते, परंतु मागील काही दिवसांपासून ऐन दिवाळीच्या काळातदेखील वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही.
हिवाळाच्या ऋतूमध्ये दव पडल्यामुळे लाइन्समध्ये खराबी येण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, असा अजब खुलासा महावितरणचे अधिकारी करीत आहेत.