पणजी – गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास सरकार स्थापनेचा पेच उद्भवू शकतो. तशा स्थितीत आम आदमी पक्ष (आप) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) मदतीचा हात मिळू शकतो, अशी आशा कॉंग्रेसला वाटत आहे.
मतदानोत्तर चाचण्यांनी गोव्यात त्रिशंकू स्थितीचे भाकीत केले आहे. त्यामुळे निवडणूक निकालाआधी जर-तरची समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत. अशात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आप आणि मगोपचा पाठिंबा मिळण्याबाबत विश्वास व्यक्त केला.
कॉंग्रेस आणि आपमध्ये आधीपासूनच वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. कुठल्याही स्थितीत भाजपला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका आपने घेतली आहे. भाजपने विश्वासघात केल्याने मगोप पुन्हा त्या पक्षाबरोबर जाणार नाही, असे ते येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कॉंग्रेसने यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाशी (जीएफपी) आघाडी केली आहे.
मागील निवडणुकीनंतर (2017) गोव्यात त्रिशंकू स्थिती उद्भवली. त्यावेळी भाजपने मगोप आणि जीएफपीच्या मदतीच्या जोरावर सरकार स्थापन केले. काही काळानंतर बऱ्याच आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला सत्तेत राहण्यासाठी इतर पक्षांची गरज उरली नाही. त्यातून मगोप आणि जीएफपीवर सरकारमधून बाहेर पडण्याची वेळ आली.