– आता 6 ऑगस्टपासून नियमीत सुनावणी सुरू होणार
– सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणात दोन्ही बाजूंशी चर्चा करून मध्यस्थीने तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती. तथापी या मध्यस्थीच्या प्रयत्नांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले असून सर्वोच्च न्यायालयाने तशी माहिती जाहींर करून या प्रकरणात आता सहा ऑगस्ट पासून दैनंदिन स्वरूपात नियमीत सुनावणी होंईल असा निर्णय सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला आहे. युक्तिवादाच्या पातळीवर ही सुनावणी येईपर्यंत आता दैनंदिन स्वरूपात ही सुनावणी होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात सर न्यायाधिश निवृत्त होणार आहेत. त्यापुर्वी म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत यावर निर्णय दिला जाईल असे चित्र आहे. पाच न्यायाधिशांच्या घटनापीठाने गेल्या 11 जुलैला या प्रकरणात नेमलेल्या तीन जणांच्या मध्यस्थांकडून आत्तापर्यत झालेल्या प्रगतीचा आढावा मागण्यात आला. त्यात तोडग्याची शक्यता नसेल तर 26 जुलैपासून या प्रकरणाची नियमीत सुनावणी घेण्याचा मनोदय न्यायालयाने व्यक्त केला होता. मध्यस्थीच्या प्रक्रियेची मुदत नंतर वाढवून देण्यात आली.
15 ऑगस्ट पर्यंत त्यांना हे काम पुर्ण करण्यास सांगण्यात आले. तथापी या प्रकरणातील एक वादी गोपालसिंह विशारद यांनी न्यायालयाला अयोध्या विवादावर मध्यस्थीच्या मार्गाने तोडगा काढण्याची प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली. यातून तोडगा निघण्याची शक्यता नसल्याने त्यात आता जादा वेळ लावण्याची गरज नाही असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. त्याविषयी आज झालेल्या सहा मिनीटांच्या सुनावणीत न्यायालयाने या विषयी 6 ऑगस्टपासून नियमीत स्वरूपात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अयोध्या प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने सन 2010 मध्ये निर्णय दिला असून त्यात त्यांनी मूळ गर्भगृहाची जागा राम मंदिर बांधण्यासाठी दिली असून एकूण जागेचे त्यांनी त्रिभाजन केले आहे. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण चौदा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या गेली नऊ वर्षे प्रलंबीत आहेत.