श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये कलम 35 अ हटवण्याच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापलेले आसतानाच आता काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणेच्या 280 अतिरिक्त तुकड्या म्हणजेच 28 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात भारतीय जवान तैनात केलेत. यामध्ये सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. जवानांच्या 280 तुकड्या कोणतेही कारण नसताना या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर जाण्याच्या सर्व रस्त्यांवर सीआरपीएफचे जवान बंदोबस्त करत आहेत. स्थानिकांनी ही परिस्थिती पाहून आवश्यक लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
परदेशी दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यांना निशाना बनवू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर 10 हजार अतिरिक्त जवान काश्मीरमध्ये तैनात केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली चिंता
काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून 280 सैन्याच्या कंपन्या काश्मीर खोऱ्यात पाठवल्यानंतर तैनात करण्यात येत असल्याचे वृत्त हाती आल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरवर बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले आहे की, काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीसाठी लष्कर आणि हवाई दलाला अलर्टवर ठेवण्यात आले आहे? हे 35 अ बद्दल नाही. जर अशा प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आला असेल तर हे काहीतरी वेगळे आहे.