रांची: करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी झारखंड सरकारने आता कडक पाउले उचण्यास सुरूवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी जर कुणी मास्कचा वापर न केल्यास किंवा करोना नियमांचे पालन न केल्यास त्याची थेट कारागृहात रवानगी होणार आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यासंदर्भात झारखंड सरकारने करोना प्रादुर्भाव 2020 अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत करोना प्रादुर्भाव 2020च्या अध्यादेशातील 39 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. झारखंड सरकारच्या या नव्या अध्यादेशाची चर्चा संपूर्ण देशात सुरु आहे. यात तब्बल एक लाख रुपयांचा दंड आकारणार असल्याने नागरिकही धास्तावले आहेत. झारखंडमध्ये काही दिवसांत मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोकांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग रोखण्यात अपयश येत असल्याने सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे, असे सरकारने म्हटले आहे. या दरम्यान झारखंड सरकारने एक अध्यादेश काढला.
या नव्या अध्यादेशामध्ये रस्त्यावर, बाजारात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुणी व्यक्तीने किंवा एखाद्या समूह मास्कचा वापर करत नसले, सोशल डिस्टंन्सिगचे पालन केले नाही आणि एखाद्या कार्यालयात, दुकानात नव्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. तर नियम तोडणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अध्यादेशानुसार जर कुणी नियम तोडले तर एक लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार. तसेच दोन वर्षांची जेलही होऊ शकतो.
दरम्यान, झारखंडमध्ये करोना रुग्ण संख्येत वाढ असल्याने राज्यातील सरकारी रुग्णालयात नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. राज्यात आता खासगी रुग्णालय आणि इतर लग्न सभागृहांमध्येही आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, झारखंडमध्ये आतापर्यंत करोना रुग्णांची संख्या 6485पर्यंत पोहोचली आहे. तर राज्यात करोनामुळे 64 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3024 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.