“पत्रास तार समजावे,’ असं लिहून प्रसंगाचं गांभीर्य अधोरेखित करण्याचा एक जमाना होता. पुढे ई-मेल आणि अन्य डिजिटल माध्यमांच्या क्रांतीमुळे तार इतिहासजमा झाली. आधी कूरिअर सेवा आणि नंतर डिजिटल क्रांती यामुळे पत्रंही फार कमीच लिहिली जातात आणि दारासमोर पोस्टमन थांबला, तरच जुन्या दिवसांची आठवण होते. पोस्टमनसुद्धा एखादं नियतकालिक द्यायचं असेल किंवा कोर्टाबिर्टाचं काही असेल तरच दारात उभा राहून हाक मारतो. “शिरसाष्टांग दंडवत’ किंवा “विनंती विशेष’ वगैरे क्वचितच कुणालातरी आठवतं आणि सोशल मीडियावर त्या दिवसांच्या रम्य आठवणी जागवल्या जातात.
स्वतःला “प्रोग्रेसिव्ह’ समजणारे अशा लोकांना “नॉस्टेल्जिक’ म्हणून हिणवतात, तर पत्रातला ओलावा ई-मेलमध्ये नाही, असं “नॉस्टेल्जिक’ लोकांचं म्हणणं असतं. पोस्ट खात्याकडे सध्या पत्रवाटपाचं फारच कमी काम राहिलेलं असलं तरी भावाला राखी पाठवण्याचं काम बहीण अजूनतरी ई-मेलवर करू शकत नाही. त्यामुळे या दिवसांत पोस्टाचं काम वाढतं. राख्या पाठवण्यासाठी बहिणी पोस्टात सोशल डिस्टन्सिंग राखून उभ्या ठाकलेल्या दिसू लागल्यात आणि त्याच वेळी पोस्टाला पत्रवाटपाचं एक मोठ्ठं काम बऱ्याच दिवसांनी मिळालंय. एकंदर वीस लाख पत्रं वाटण्याचं हे काम आहे. वेगवेगळ्या शहरांमधून, गावांमधून ही पत्रं येणार असली, तरी त्यातली दहा लाख पत्रं मुंबईत तर दहा लाख पत्रं दिल्लीत एकाच घरात द्यायची आहेत.
“जय श्रीराम’ असा मजकूर असलेली दहा लाख पत्रं पवारांना पाठवायचा निर्णय भारतीय जनता युवा मोर्चाने घेतला. हजारो पत्रं पोस्टात पडायला सुरुवातही झाली. कार्यकर्त्यांच्या भावना पत्रातून व्यक्त करण्याचा “ट्रोलिंग युगा’तला हा नवा फंडा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रचंड आवडला. त्यांनीही ठरवलं, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं लिहिलेली दहा लाख पत्रं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवायची. खरं तर सध्याच्या सोशल डिस्टन्सिंगच्या काळात ही दोन्ही कामं “ऑनलाइन’ होऊ शकली असती. जिथं शक्य आहे तिथं “ऑनलाइन’ व्यवहारांचा वापर करा आणि गर्दी टाळा, असं केंद्र आणि राज्य सरकार वारंवार सांगतंय.
नेट बॅंकिंग आणि मोबाइल बॅंकिंग ऍपच्या वापरात वाढ झाल्याची आकडेवारी येतीय. अनेकजण नव्यानं हे व्यवहार शिकताहेत. पण त्याच वेळी राजकीय कार्यकर्ते मात्र आपल्या भावना पंतप्रधानांना आणि पवारांना “ऑनलाइन’ कळवू इच्छित नाहीत. याला म्हणतात “परफेक्ट राजकीय न्यूज सेन्स आणि कॅमेरा सेन्स’!
या संपूर्ण पत्रप्रपंचाला एक सकारात्मक बाजू आहे. कोविड-19 च्या सध्याच्या प्रसारकाळात प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवराय ही दोन्ही नावं आठवायलाच हवीत. प्रभू रामचंद्रांनंतर जनतेनं रामराज्य पाहिलं ते शिवकाळातच. संकटकाळी ही दोन नावं लाखो कार्यकर्त्यांकडून लिहिली जाणार असतील आणि दोन वरिष्ठ नेत्यांकडून लाखो वेळा वाचली जाणार असतील तर बरंच आहे. नेत्यांना उत्कृष्ट शासनपद्धतीची आणि कार्यकर्त्यांना गनिमी काव्याची आठवण करून देणारा हा पत्रप्रपंच संकटाच्या प्रसंगी दिशादर्शक ठरो!
– हिमांशू