मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात टास्क फोर्सने सुद्धा महत्त्वाचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
टोपे म्हणाले, शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबतही शाळा सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. शालेय शिक्षण विभागाचाही शाळा सुरू करण्याच्या संदर्भात प्रस्ताव आहे. आरोग्य विभागाने तर परवानगी दिली आहे.
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, निश्चितपणे मुख्यमंत्री स्तरावर या संदर्भात अंतिम निर्णय होईल. तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दाही मांडण्यात आला आहे.
चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र 12 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल.
निर्बंध आणखी शिथिल होणार
50 टक्के पर्यंतच्या परवानग्या नाट्यगृह आणि सिनेमागृहांना दिल्या आहेत. परिस्थिती सुधारत आहे आणि अशीच सुधारत राहिली तर भविष्यात निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. आता राज्यात 700 ते 800 रुग्ण दैनंदिन आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण 98 टक्के इतके आहे. मुले आजारी पडल्याचे प्रमाण जास्त नाही. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी ती सौम्य स्वरुपाची असेल, सध्यातरी फार काळजीचा विषय नाही. मात्र, असे असले तरी, काळजी घेणे आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या बाबतीत पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाण 80 टक्के इतके आहे तर दुसरा डोस पूर्ण झाल्याचे प्रमाण 40 टक्के इतके आहे. आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे तर त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.