मुंबई – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे पद धोक्यात आले आहे. संजय पांडे हे पोलीस महासंचालक या पदासाठी पात्र नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महासंचालक पदावर रुजू झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे क्लियरन्स आवश्यक असते. जे आता संजय पांडे यांना मिळण्याची शक्यता मावळली आहे. यामुळे राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
या संदर्भात मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आता आयोगाने उत्तर दिले आहे. पांडे यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ. व्येंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली असल्याची माहिती आहे. मात्र काही राज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाला बगल दिली आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री हेच शेवटचा निर्णय घेऊ शकतात, असे देखील बोलले जात आहे.
संजय पांडे यांनी सरकारी सेवेतून मध्यंतरात अवकाश घेऊन सुमारे दोन वर्षे खासगी क्षेत्रात सेवा केली होती. दोनदा सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेर ही भीती अखेर खरी ठरली आहे. लोकसेवा आयोगाच्या 1 नोव्हेंबरला झालेल्या शिफारसी या 10 नोव्हेंबरच्या सुमारास मुंबईत पोहोचल्या आहेत.
संजय पांडे यांना पदावरुन पायउतार व्हावे लागल्यास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. के. व्येंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यापैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड केली जाऊ शकते.
संजय पांडे सेवेत असताना त्यांनी अवकाश घेत खासगी सेवेतही काम केले जे त्यांच्या विरोधात गेले. सरकारी अधिकारी अशा प्रकारे अवकाश घेऊन खासगी सेवेत कसा काम करू शकतो, असाही प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पुढे उपस्थित झाला. मात्र यावर आता राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असेल ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.