तर माझा ठेकेदार पाठवून काम पूर्ण करणार
डिसेंबरअखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यास मी माझा ठेकेदार पाठवून काम पूर्ण करणार आहे. मी ठेकेदार दिला असे कोणी म्हटले तरी मला काही फरक पडत नाही. कारण आम्ही टक्केवारी घेत नाही म्हणून मोठ्या मताधिक्क्याने फरकाने निवडून येतो. खासदार विखे यांनी असे सांगताच यापूर्वी महामार्गाच्या कामात झालेल्या टक्केवारीची चर्चा सभागृहात सुरू झाली.
पाथर्डी – कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करावे अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी, अशा सूचना खासदार सुजय विखे यांनी दिल्या. पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण- विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. हे काम सुरू करण्यासंदर्भात व पैठण पंढरपूर पालखी मार्गातील जमीन अधिग्रहित शेतकऱ्यांच्या तक्रारीसंदर्भात खा. विखे यांनी तहसील कार्यालयात बैठक घेतली.
यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, राष्ट्रीय महामार्गाच्या नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता माळवदे, औरंगाबाद विभागाचे कार्यकारी अभियंता चिवारे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाठ, अनिल कराळे, मोहनराव पालवे, माणिक खेडकर, गोकुळ दौंड, नंदकुमार शेळके, काशिनाथ लवांडे, दिनकराव पालवे, अजय रक्ताटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
जुलै 2017 पर्यंत हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र हे काम ठेकेदार कंमनीमुळे रेंगाळल्याची माहिती कार्यकारी अभियंता माळवदे यांनी दिली. रत्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. कोरडगाव रस्त्यालगतची गटार अपूर्ण केल्याने नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची वेळ आली आहे. शहरात गटारीची उंची जास्त झाल्याने उपनगरात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र अधिकारी मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केला. कोरडगाव रस्त्यालगतची गटार नदीपर्यंत करावी व शहरातील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनी केली.
फुंदे टाकळी फाटा ते आगसखांडपर्यंत झालेले काम अत्यंत निकृष्ट आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमावले लागले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष दिनकराव पालवे व अजय रक्ताटे यांनी केली.
यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले, शासनाचा निधी उपलब्ध असताना काम का बंद आहे याचे कोडे मला पडले आहे. अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत दिल्ली येथे बैठक बोलावून कारवाई केली जाईल. डिसेंबर अखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही, तर एक जानेवारीला मी स्वतः नवीन ठेकेदार नेमून जुन्या ठेकेदार कंपनीला टर्मिनेशन ऑर्डर काढेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पैठण- पंढरपूर पालखी मार्गासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली. रस्त्याच्या रुंदी संदर्भात अधिकारी व शेतकऱ्यांचे एकमत होत नसल्याचे बैठकीत लक्षात आले. रस्त्याची रुंदी दहा मीटर आहे मात्र शासनाने 18 मिटर पर्यंत जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्याचा मोबदलाही मिळाला नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. बैठकीतच अनेक शेतकरी अधिकाऱ्यांना जाब विचारू लागले. या संदर्भाभात स्वतंत्र बैठक घेण्याची गरज आहे. येत्या पंधरा दिवसात शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना बोलावून स्वतंत्र बैठक घेऊ असा निर्णय विखे यांनी जाहीर केला.