परदेशी विद्यार्थीनीने केली तक्रार
कानपूर – इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे शिकणाऱ्या एका परदेशी विद्यार्थ्यीनीने येथील एका प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थीनीने याची तक्रार थेट तिच्या देशातील भारतीय दुतावासाकडे केली आहे. दुतावासाने ही तक्रार आयआयटी प्रशासनाकडे वर्ग केली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
यासंदर्भात आयआयटी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भातील तक्रार आम्हाला मिळाली असून याची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अभियांत्रिकी विभागातील एका वरिष्ठ प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली ही विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे. दरम्यान, या प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याने गेल्या काही दिवसांपासून पीडित विद्यार्थीनी अस्वस्थ होती. पीडित विद्यार्थीनी या संस्थेत इतर देशांच्या स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत आली आहे.
दरम्यान, या विद्यार्थीनीने रविवारी विमेन्स सेलकडे तक्रार केली होती. मात्र, या सेलच्या प्रशासनाने तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही की ही तक्रार पुढेही पाठवली नाही. त्यानंतर या विद्यार्थीनीने थेट भारतातील आपल्या देशाच्या दुतावासाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर दुतावासाने आयआयटीच्या प्रशासनाशी संपर्क साधून या तक्रारीबाबत चौकशीची विनंती केली.