मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली आहे. दरम्यान, आता पावसाचा जोर थोडा कमी झाला असून मुंबईत आणखी दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळणार आहेत, या विषयीची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच गणेशविसर्जनाच्या दिवशीदेखील पश्चिम किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टीवर पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकुळ घातला असला तरी कालपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काल अनेक ठिकाणी ऊन पडल्याचे पहायला मिळाले. तर मंगळवारी सकाळी अंधेरीमध्ये घराच्या छताचा भाग कोसळून तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.