कोल्हापूर – “कोल्हापूरतील एक मंत्री परवाच म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान देणारच? पण केव्हा ते सांगा ना? ते तुम्ही सोयीस्कररित्या सांगत नाही. याप्रश्नी सरकार चालढकल करीत आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. शेतकरी भीक मागत नाही. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. उद्रेक झाला तर तुम्हाला घराचे बाहेर फिरणे अवघड होईल’असा गर्भित इशारा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
नुकतेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंबंधी वक्तव्य केले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष घाटगे यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता प्रोत्साहन अनुदानावरुन त्यांना टोला लगाविला आहे.
घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे, “राज्य सरकारकडे आश्वासनाची खैरात करावयासाठी पैसे आहेत. गरीब मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी, तसेच मंत्र्यांची मुंबईतील निवासस्थानाची थकलेली बिले भरण्यास पैसे आहेत.परंतु या सरकारला आज दीड वर्ष झाले तरी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत. दोन लाख रुपयांवरील कर्ज भरल्यानंतर दोन लाख रुपयांची कर्जमाफी ही घोषणा अद्याप हवेतच आहेत.’
वीज बिलामध्येही फसवणूक
राज्य सरकारने थकीत वीज बिलाबाबत घुमजाव केले. मागील वर्षी जाहीर केलेली सवलतीची घोषणा सरकारने ऐनवेळी मागे घेतली. आणि तातडीने थकीत वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्यास सुरवात केली. कनेक्शन तोडण्याच्या भीतीने सर्वांनी थकीत वीज बिले टप्याटप्यानी भरली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा विज बिल वसुलीसाठी घरगुती व शेती पंपाची कनेक्शन तोडली जात आहेत. हा त्यांच्यावर अन्याय असून तो त्वरित थांबवावा.’