मुंबई : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या शैलीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सरकारी कर्मचाऱ्यांना परिपत्रक काढून बोलावण्यात आल्यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी दिल्लीतील नाराजी नाट्यावर भाष्य केले.
“मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सर्व अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका यांना खुशाल बैठकीसाठी बोलावलं आहे. असे राज्यात कधी झाले नव्हते. परिपत्रक काढून त्यांना बोलावण्यात आले आहे. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी या महिला सभेला आल्या तर मग लहान मुलांचं काय? त्यांना कोण सांभाळणार? आता मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली असेल तर अवघड आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले की, “राज्यातील जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री नेमले नाहीत. सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की नवीन पालकमंत्री आल्यानंतर डीपीडीसी बाबत निर्णय घेतील. आता जर निधी खर्च झाला नाही तर पैसे लॅप्स होतील. कदाचित त्यांची अडचण असेल की एका जिल्ह्यात दोन तीन इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हा प्रश्न असेल,” असेही अजित पवार म्हणाले.