नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे. संतप्त काँग्रेस नेते देशभर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशात आज चेन्नईतील काँग्रेस आमदार निषेध व्यक्त करण्यासाठी काळे शर्ट घालून विधानसभेत पोहोचले आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या या आंदोलनावर आता केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेखावत यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींनी वीर सावरकरांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेऊन त्यांचा अपमान केला आणि अनेकांच्या भावना दुखावल्या.सावरकरांना जाणून घ्यायचे असेल तर एकदा अंदमानच्या तुरुंगात जाऊन पाच मिनिटे मौन धरून बसा, तिथल्या भिंती आजही सावरकरांच्या संघर्षाच्या साक्षीदार आहेत.
“राहुल गांधींनी सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते देशभरात तीव्र पद्धतीने आंदोलन करत आहेत. या निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी ज्या पद्धतीने न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींवर प्रश्न उपस्थित केले त्यावरून स्पष्ट होते की, काँग्रेसपक्ष नेतृत्व आणि त्यांच्या नेत्यांचा ना संविधानावर विश्वास आहे ना न्यायव्यवस्थेवर” असं देखील शेखावत यावेळी म्हणाले.
राहुल गांधींच्या शिक्षेनंतर काँग्रेसने ज्या पद्धतीने न्यायालय, न्यायव्यवस्था आणि न्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित केले, त्यावरून पक्ष, त्यांच्या नेतृत्वाचा आणि नेत्यांचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे असं देखील शेखावत यावेळी म्हणाले.
सुरत कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना आरोपी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.