मुंबई – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत (Maratha Arakshan Update) इशारा दिला आहे. जरांगे सध्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन आपले आरक्षणाबाबतचे म्हणणे समाजापर्यंत पोहचवत आहेत. अशात सरकारने २४ तारखेपर्यंत आरक्षण न दिल्यास पुढील रणनीती नेमकी काय असेल याबाबत जरांगे यांनी भाष्य केले आहे.
उपोषणानंतर जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत लवकरच संपणार आहे. अशात सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू केलं जाणार आहे. त्या उपोषणादरम्यान, कुठलेही औषधोपचार किंवा वैद्यकीय सेवा घेतली जाणार नाही. अन्न आणि पाण्याचाही त्याग केला जाईल” अशी चेतावणी जरांगे पाटील यांनी सरकारला दिली आहे.
“प्रत्येक सर्कलमधील सर्व गावाच्या वतीने एकाच ठिकाणी महाराष्ट्रभर ताकदीने साखळी उपोषण सुरू केलं जाणार आहे. २८ तारखेपासून या साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. त्याबाबतच्या सूचना देखील मनोज जरांगे यांनी दिल्याचे समजते.
राजकारण्यांना गावात फिरू देणार नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावात पाय ठेऊ देणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ देणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावच्या सीमाही तुम्हाला शिवू देणार नाही” असा इशारा जरांगे पाटील यांनी राजकारण्यांना दिला आहे.