नवी दिल्ली – लखनऊ मधील हजरतगंज कोतवाली येथे रविवारी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, पांडव आणि कौरवांबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप राम गोपाल वर्मा यांच्यावर आहे. एडीसीपी राघवेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंडबाच्या अर्जुन एन्क्लेव्ह फेज 2 कुर्सी रोड येथील रहिवासी मनोज कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा विरोधात आयटी कायद्याच्या अनेक कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू झारखंडमधून आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या असल्याबद्दल भाष्य केले होते, महाभारत काळातील दोन नावांचा आधार घेत, त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. या वादामुळे त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना राम गोपाल वर्मा यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे म्हटले होते.
राम गोपाल वर्मा यांनी द्रौपदी मुर्मूला केलेल्या टीकेमध्ये म्हटले होते की, ‘जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत? यानंतर राम गोपाल वर्मा यांच्यावर एससी-एसटी लोकांचा अपमान केल्याचा आरोप केला गेला.
यावर आपले स्पष्टीकरण देताना राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले की, ‘मी हे केवळ गंभीर विडंबनासाठी बोललो आणि त्याचा दुसरा कोणताही उद्देश नव्हता. ‘महाभारत’मधलं द्रौपदी हे माझं आवडतं पात्र आहे, पण नाव फारच कमी असल्यानं मला त्याच्याशी निगडित पात्रं आठवली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.’
दरम्यान, मनोज यांनी तक्रारीत म्हटले आहे की, यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत जाणूनबुजून ट्विट करणे योग्य नाही. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहे. त्यांचे ट्विट महिलेचा अवमान करणारे आहे. त्यांनी कौरव आणि पांडवांचेही चुकीचे वर्णन केले, त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.’