ऑकलंड – महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आता उपांत्य फेरीतील स्थानासाठी मोठी स्पर्धा सुरू होणार आहे. साखळीतील सर्व सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे, तर वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना पावसाने वाया गेल्यावर दक्षिण आफ्रिकेलाही या फेरीत स्थान मिळाले आहे.
आता उपांत्य फेरीतील अन्य दोन स्थानांसाठी भारत, इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यात मोठी स्पर्धा होणार आहे. त्यातही भारताने दक्षिण आफ्रिकेशी येत्या रविवारी होणारा आपला साखळीत अखेरचा सामना जिंकला तर भारतीय संघ थेट उपांत्य फेरीत स्थान मिळवेल.
तसेच वेस्ट इंडीजने साखळीत जास्त पराभव स्वीकारले असल्याने इंग्लंडचा नेट रनरेट सरस झाला आहे, त्यामुळे त्यांचा संघही या फेरीत पात्र ठरेल. अर्थात आणखी एक गणित जुळून येऊ शकते.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी साखळीतील अखेरचा सामना गमावला आणि न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकला, तर वेस्ट इंडीजचे स्थान निश्चित होणार आहे.