चंदिगड – मुख्यमंत्रिपद जरी मिळाले तरी आपण कायमच सामान्य माणूस असू, असे आम आदमी पार्टीचे पंजाबमधील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी म्हटले आहे. आपण जरी मुख्यमंत्री झालो, तरी हे पद आपल्या डोक्यात जाणार नाही. कारण प्रसिद्धी ही आपल्या आयुष्याचाच एक भाग राहिलेली आहे, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भगवंत मान यांच्यावर विरोधकांकडून मद्याच्या व्यसनाबाबत जोरदार टीका केली जात होती. सार्वजनिक कार्यक्रमात आणि अगदी संसदेमध्येही भगवंत मान हे मद्यधुंद अवस्थेमध्ये उपस्थित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला होता. त्या टीकेला उत्तर देताना मान यांनी आपण सामान्य माणूस असल्याचा पुनरुच्चार केला.
“मी सामान्य माणूस आहे. मी अजूनही सामान्य माणसांमध्ये जाऊन काम करेन. मी जर मुख्यमंत्री झालो तरी राजकारण माझ्या डोक्यात जाईल, असे मला वाटत नाही.’ असे मान म्हणाले.
पंजाबला पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. पूर्वीचा पंजाब हा स्वप्नांचा पंजाब होता. लोकांना हा पूर्वीचा पंजाब हवा आहे. आम्ही पंजाबला पुन्हा एकदा पंजाब बनवणार आहोत. पंजाबला पॅरिस, लंडन किंवा कॅलिफॉर्निया बनवण्याची काहीही गरज नाही, जर तसे स्वप्न कोणी दाखवत असेल तर ते पराभूत होतील, असे मान म्हणाले.