अरुण गोखले
महर्षी चरक यांना वनस्पतीचे विविध औषधी उपयोग ठाऊक होते. अनेक निरीक्षण, प्रयोग आणि संशोधनाचा आधाराने त्यांनी स्वत:च अशी अनेक जालीम वनस्पतिजन्य औषधे शोधून काढली होती. झाडपाला, काढे, मुळ्या, लेप या संदर्भातील त्यांना खूप ज्ञान होते. त्यांनी तयार केलेल्या औषधी, त्यांचा अभ्यास, त्यावर केलेले लेखन यामुळेच आयुर्वेदाची जणू एक वेगळी शाखाच त्यांच्या नावाने निर्माण झालेली होती. “चरक संहिता’ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे असंख्य वनौषधीचे एक भव्य भांडारच आहे.
त्यांच्या संदर्भात एक गोष्ट अशी सांगतात की, एकदा चरक ऋषी औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यांसह रानावनांतून फिरत असताना ते एकदम एका जागी थांबले. कसलासा सुगंध त्यांना सुखावून गेला. एक सुंदर फूल पाहून ते मोहित झाले. काहीतरी दिव्यलाभ झाल्यासारखे ते त्या फुलाकडे एकटक नजर लावून पाहू लागले. चटकन पुढे व्हावे, ते फूल तोडून घ्यावे, असे त्यांना वाटू लागले. पण त्यांचे सुसंस्कारीत मन त्यांना तसे करू देईना. त्यांच्या मनात विलक्षण चलबिचल होत होती. त्या फुलाला हस्तगत करण्याचा मोह त्यांना आवरता येत नव्हता. ते सर्व भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
आपल्या गुरूदेवांची ती अवस्था पाहून शिष्यांना राहावले नाही. एक शिष्य पुढे येऊन म्हणाला, “”काय झाले गुरूदेव! तुम्हाला ते फूल हवे आहे का? थांबा, मी चटकन जातो आणि ते फूल तोडून आणतो.” त्यावर चरक ऋषी म्हणाले, “”नको, आपण हे असं कुणाला न विचारता ते फूल तोडून घेणे योग्य नाही. घ्यायचंच झालं तर ते विचारून, परवानगी घेऊनच घ्यायला हवे.”
“”पण गुरुजी! अहो इथं कुणाला विचारायचे? या शेताचा मालक तर इथे जवळपास राहात नाही. तो दूर राहतो त्या गावात आणि गाव म्हणाल तर तो चांगला 2/3 मैल दूर आहे. तिथे कोण जाणार? आणि त्याला काय विचारणार? तर तुझ्या शेताच्या बांधावर आलेल्या झाडाचे ते फूल आम्ही घेऊ का म्हणून? त्याची काय गरज आहे? नाहीतरी इथे कुणाला काय कळणार आहे?”
ते शिष्याचे बोलणे ऐकले आणि चरक ऋषी त्याला समजावित म्हणाले, “”हे बघ बाळा! आपण त्या मालकाला न विचारता हे फूल घेणे म्हणजे एक प्रकारची चोरी होईल. आपली ती कृती नैतिकतेची होणार नाही.” बरं असं नुसतं आपल्या शिष्याला सांगून समजावून ते थांबले नाहीत. तर चरक ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन 2/3 मैलावरील त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. त्यांनी त्या शेतकऱ्याची भेट घेतली.
आपल्याला त्याच्या शेतातले ते फूल हे नेमके का आणि कशासाठी हवे आहे हे त्यास सांगितले. त्याची परवानगी घेतली आणि मगच येऊन ते फूल मिळवले.त्या फुलामुळे त्यांना आणखी एका प्रभावी पुष्पाषौधीचा शोध लागला. कुणाचीही एखादी वस्तू दुसऱ्याला न विचारता घेणे हे चोरी करण्यासारखे आहे. तसे करू नये, हवं म्हणून घेणं हे योग्य नाही. चरक ऋषीच्या त्या बोलक्या कृतीतून शिष्यांना मात्र नैतिकतेचा एक आदर्शपाठ मिळाला.