मुंबई: आयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. वयाच्या 20 व्या वर्षापासून प्रत्येक कारसेवेत सहभागी झालो आणि तुरुंग पाहिला, 3 अंश सेल्सिअस तापमानात झोपलो त्यावेळी खांद्यावरुन गोळ्या जाताना देखील पाहिल्याचं फडणवीस म्हणाले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वयाच्या 20 व्या वर्षी 30 सप्टेंबर 1989 ला पहिल्यांदा कारसेवेसाठी गेलो होतो. एका बाबांच्या आश्रमात 5-6 दिवस राहिलो. त्याठिकाणी 3 अंश सेल्सिअस तापमान असायचं. आम्ही शंकराचार्यांसोबत पायी निघालो. त्यानंतर आम्हाला गंगेवरील एका पुलावर थांबवण्यात आलं. तेथे लाठीचार्ज झाला. शंकराचार्यांना अटक करण्यात आलं. तेव्हा खांद्यावरुन बंदुकीच्या गोळ्या जाताना पहिल्याच फडणवीस म्हणाले.
14-15 दिवस आम्ही बदायुच्या तुरुंगात होतो. राम मंदिराचा विषय आमच्यासाठी हा राजकीय विषय नव्हता, तर अस्मितेचा विषय होता. तसेच हे आंदोलन भाजपने नाही तर विश्व हिंदू परिषदेने सुरु केल होतं. अयोध्या राम जन्मभूमी आहे आणि तेथे प्रभू श्रीरामांचं मंदिर हवं ही आमची इच्छा होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज ज्यावेळी निकाल आला तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. इतक्या वर्षांच्या संघर्षातनंतर यश आलं. जेथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेथे मंदिर होत आहे. उद्याचा सोहळा याची देही, याची डोळा पाहायला मिळाला याच्या इतका दुसरा मोठा आनंद नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.