पुणे : मुंबईतील सम-विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याच धर्तीवर संपूर्ण राज्यात व्यापाऱ्यांना दररोज दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्रकडून (फाम) करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी केली आहे.
करोनामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे काही काळ व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. त्यानंतर 5 जूनपासून शासनाने सम-विषम दिनांकानुसार दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर दररोज दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्यातील शिखर संघटना असलेल्या फामने केली होती. त्याबाबत मुंबई येथे निर्णय झाला आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यात होणे आवश्यक असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.