‘मेरी माटी मेरा देश’ या महाअभियानाला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, अभियानाचे शहर संयोजक पुनीत जोशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते.
पांडे म्हणाले, ‘स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नमन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. 15 सप्टेंबरपर्यंत बूथ स्तरावर प्रत्येक घरातून माती किंवा धान्य गोळा करण्यात येणार आहे. त्या व्यक्तिचा माती किंवा धान्य घेतानाचा सेल्फी https://selfiewithmerimaati.in/photoupload/ या लिंकवर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’
पुढे पांडे म्हणाले, ‘अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात किंवा गाव पातळीवर 75 रोपे लावून अमृतवाटीका तयार केली जाणार आहे. परिसरातील शाळा किंवा महाविद्यालयात शिलालेख लावले जातील. तालुका स्तरावर एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड यांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 29 ऑक्टोबर पूर्वी तालुका स्तरावरील कलश राज्य मुख्यालयात पाठविले जातील. दिल्ली येथे 31 ऑक्टोबरला अमृत कलशांतील माती शहीद वीरांच्या स्मरणार्थ कर्तव्य पथावर बांधलेल्या अमृत वाटिकेला अर्पण केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितांना संबोधित करतील’
भाजपचे रविवारी हर घर जनसंपर्क अभियान
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या ‘मेरी माटी मेरा देश’ या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील भाजपचे बूथ स्तरावरील चार हजार कार्यकर्ते येत्या रविवारी (10 सप्टेंबर) माती किंवा धान्य अमृत कलशात संकलन करण्याच्या निमित्ताने हर घर जनसंपर्क अभियान राबविणार असल्याची माहिती अभियानाचे शहर संयोजक पुनीत जोशी यांनी दिली.
जोशी म्हणाले, ‘या निमित्ताने सैनिक, स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली जाणार आहे. संध्याकाळी चार ते सहा या वेळेत मंडल स्तरावर अमृत कलशांचे संकलन केले जाणार आहे. त्या ठिकाणी पंचप्रणाची शपथ घेऊन अमृतकलश यात्रा काढली जाणार आहे.