पिंपरी, (प्रतिनिधी) – सीईटी सेलतर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा घेतली जाते. मात्र, या परीक्षेचे केंद्र शहराच्या बाहेर दुसऱया टोकाला देण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले असून वेळेत पोहचणार कसे? असा त्यांचा प्रश्न आहे. मार्चमध्ये विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा सुरू झाली आहे.
तर, काही परीक्षा पुढच्या महिनाभरात होणार आहेत. त्यात विविध व्यावसायिक अभ्यास क्रमांचा समावेश आहे. विधी, वैद्यकिय, शैक्षणिक आदींचा समावेश आहे. या परीक्षा शहरात असणे अपेक्षीत आहे. किंवा रहात्या घरापासून किमान १० ते १२ किलोमीटर अंतरावर घेणे आवश्यक असल्याचे पालकांचे मत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र येवलेवाडी, बोपदेव घाट, पुणे शहरच्या टोकाला असेलल्या उपनगरांमध्ये आलेले आहे. तर, पुणे शहरात रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे पिंपरी चिंचवड शहर, उपनगरांमध्ये आलेले आहे. काहींचे तर मावळ परिसरातील तळेगावमधील महाविद्यालयांमध्ये केंद्र आहेत. तसेच सकाळी ९ ते ११ अशी वेळ असलेल्यांना सकाळी ७.३० चे रिपोर्टींग आहे.
त्यामुळे एका शहरातून दुसऱया शहरात पोहचणे तसेच परीक्षा केंद्र असलेले उपनगर, शोधणे आणि वेळा गाठणे ही विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी कसरत ठरत आहे. एक तर, परीक्षेचा ताण त्यात शहराबाहेर जाऊन केंद्र शोधण्याचे काम विद्यार्थी आणि पालकांना लागलेले आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करताना सीईटीचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांना पार करावा लागत आहे.
सीईटी परीक्षेचे केंद्र घरापासून किमान १० ते १२ किलोमीटर अंतरावर असावे. तसेच शहरातच असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षेला पोहचता येईल, असे पालकांचे मत आहे. स्पर्धेच्या या युगात विद्यार्थी अधीच गुणांमध्ये अडकत असून त्यात दुसऱया शहरातील केंद्र शोधण्याचा आणि वेळा गाठण्याचा ताण रहाणार नाही. त्यामुळे सीईटी सेलने परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना सोईचे असेल, अशा ठिकाणी द्यावे, अशी पालकांची मागणी आहे.