कोल्हापूर – पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आस्थापना मंडळ कार्यरत आहे. या मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार त्यांच्या बदल्या केल्या जातात. पण फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना या मंडळांच्या शिफारसी डावलून किती बदल्या केल्या असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. फडणवीस यांना दुसऱ्यांचे कॉल रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आज फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये रॅकेट असल्याचा दावा करीत त्या संबंधात केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी करीत आहोत असे म्हटले आहे, त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की आज फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे, त्यात विशेष काहीही नाही. त्यांनी दिलेला डेटा चुकीचा आहे. त्यांनी दिलेला अहवालही धादांत खोटा आहे. कोणाचेही फोन कोणालाही टॅप करण्याचे अधिकार नाहीत. हे अधिकार फडणवीस यांना कोणी दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
स्वत: फडणवीस यांनीही त्यांच्या काळात नियम डावलून अनेक बदल्या केल्या आहेत. त्याचीही चौकशी लावली पाहिजे असेही ते म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्या मार्फत भाजपने फोन टॅपिंग केले का? त्या भाजपच्या हस्तक म्हणून काम करीत होत्या का असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. रोज पत्रकार परिषदा घेऊन लोकांचे लक्ष अन्य प्रश्नाकडेच वळवण्याचा प्रयत्न फडणवीस कशासाठी करीत आहेत असा सवाल करून पाटील यांनी म्हटले आहे की, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि स्फोटकांच्या गाडीच्या प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांच्या दलाला चार दिवस मिळाले असते तर त्यांनी त्याचा योग्य तपास केला असता पण त्यात मध्येच केंद्र सरकारचे एनआयए घुसवण्यात आले असे ते म्हणाले.