Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती जरांगे यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, ’20 जानेवारीला सकाळी 9 अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे.
शहागड मार्गे-गेवराई-पाडळशिंगी-मादळमोई-तांदळा मातुरी मार्गे खरवंडी -पाथर्डी-तिसगाव -करंजी घाट-अहमदनगर-केडगाव-सुपा-शिरुर-शिक्रापूर-रांजणगाव-वाघोली-खराडीबायपास-चंदननगर-शिवाजीनगर-पुणे-मुंबईहायवे-लोणावळा-पनवेल (नवी मुंबई) -वाशी-चेंबूर-आझाद मैदान (मुंबई)-दादर-शिवाजीपार्क असा मुंबईला जाण्याचा मार्ग असल्याचं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘आपण शांततेच्या मार्गानं मुंबईत जाणार आहोत. आरक्षण मिळवलं नाहीतर, मराठ्यांच्या मुलांचं प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे कुणीही घरी बसू नये. घरी राहिलो, तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल. ही शेवटची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय माघारी यायचं नाही. ट्रॅक्टरमध्ये काय साहित्य घ्यायचं? पाण्याची व्यवस्था कशी आहे? धान्य कसं घ्यायचं? याची सगळी माहिती पीडीएफद्वारे दिली जाईल.’ असं देखील यावेळी ते म्हणाले.