मुंबई – राज्यातील करोनाचे प्रमाण पुन्हा लक्षणीयरित्या वाढत आहे ही काळजीची बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी यापुढील काळात सार्वजनिक स्वरूपातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रश्न उपस्थित केला आहे.
1 मार्चपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, जयंत पाटील, छगन भुजबळ हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अधिवेशनाच्या काळातच सरकारमधील मंत्री पॉझिटिव्ह कसे येतात असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.
संदिप देशपांडे यांना लोकल ट्रेनवरून देखील सरकारवर टीका केली आहे. “लोकल ट्रेन ही मुंबईत सुरू केली मग आकडे अमरावतीमध्ये कसे वाढले ? या आकडेवारीचा सोर्स काय आहे ? जर तुम्ही टेस्टींग वाढवलं तर रूग्णांची आकडेवारी वाढणार आहे. हे स्पष्ट आहे. राज्याचा ‘रिकव्हरी रेट’ हा 95% आहे. तरीही लोकांना का घाबरलं जातय ? महाविकास आघाडी सरकारला अधिवेशन चालवायचं नाही, असा आरोप देशपांडे यांनी केला आहे.