मुंबई, दि. 18 – राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.
राज्यात पहिल्यांदाच 12500 पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. करोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचेही अनिल देशमुख यांनी अधोरेखित केले.
तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचेही मान्य केले. आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्यात. एटीएस आणि एनआयएकडून याचा तपास सुरू आहे. चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. विरोधी पक्षनेते सगळीकडून माहिती घेत असतात, गटबाजी प्रत्येक ठिकाणी असते, असेही त्यांनी सांगितले.
चौकशीत बाधा येऊ नये म्हणून बदल्या
पोलीस दलात करण्यात आलेल्या बदल्या या चौकशीतून काही गोष्टी समोर आल्यानंतर करण्यात आल्या ओहत. तसेच चौकशीत बाधा येऊ आणि मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्तालयातील सहका-यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली. एनआयए आणि एटीएसच्या तपासात काही बाबी आढळल्या आहेत. परमबीर सिंग यांच्या कार्यालयाकडून काही गंभीर चुका झाल्या आहेत, त्या माफ होण्यासारख्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.