अकोले (प्रतिनिधी) – आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी भागात खरेदी केंद्रे सुरू करून हिरडा खरेदी करण्यात यावा.लॉकडाऊनमुळे परिसरातील जनतेच्या हाताला काम नाही. त्यामुळे मनरेगा व रोजगार हमी योजनांची कामे सुरू करण्यात यावीत. तसेच निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर होते. ते भंडारदरा येथे आले असता त्यांना माजी आमदार पिचड यांनी वरील मागन्यांचे निवेदन दिले. यावेळी सरपंच पांडुरंग खाडे, विजयराव भांगरे, सुरेश गभाले, संतोष सोडनर उपस्थित होते. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील गौण खनिज अंतर्गत हिरड्याचे उत्पादन दरवर्षी मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी त्याचे उत्पादन ही मोठ्याप्रमाणात झालेले आहे. परंतु या वर्षी आदिवासी विकास विभागाने हिरडा खरेदी केंद्रामार्फत खरेदी केलेली नाही. तरी हिरडा खरेदी केंद्र तातडीने सुरू करून आदिवासींना दिलासा द्यावा.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने या भागातील आदिवासी जनतेच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मनरेगा व रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच निसर्ग चक्रीवादळाने शाळा खोल्यांचे, शेतीचे, घराचे मोठे नुकसान झाले आहेत.
या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई द्यावी, अशी मागणी पिचड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर सविस्तर सकारात्मक चर्चा होऊन संबंधिताना आदेश देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी आश्वासन दिले.