हिंगोली – याहीवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यावर वरून राजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कोवळ्या पिकांना फटका बसत असून त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने सेनगाव तालुक्याला चांगलेच झोडपले.
तालुक्यातील साखरा, उटी, ब्रम्हचारी, केलसुला, हिवरखेडासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. काही ठिकाणी पिके सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. गेल्या महीनाभरापासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पीकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कोळपनी, फवारणी, निंदन आदी कामे खोळंबली आहेत.