पुणे – महाराष्ट्राला साखर उद्योगाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. यावर्षीचा साखर उद्योगाचा “टर्न ओव्हर’ एक लाख आठ हजार कोटींचा झाला असून पुढच्या तीन वर्षांत आपण अडीच लाख कोटींचा उच्चांकी टर्न ओव्हरचा टप्पा गाठू शकतो, एवढी ताकद साखर उद्योगामध्ये आहे. किंबहुना साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात ताकद आहे, असा विश्वास राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.
साखर संकुलच्या माध्यमातून साखर आयुक्त या नात्याने शेखर गायकवाड यांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णयांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी “वस्मा’अर्थात “वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन’तर्फे शेखर गायकवाड आणि साखर संचालक उत्तम इंदलकर यांच्या “विशेष कृतज्ञता सत्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “महाराष्ट्र राज्य साखर उदयोगाचा भविष्यवेध’ याविषयी मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. यावेळी साखर संचालक उत्तम इंदलकर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मुंबईचे महाव्यवस्थापक शशी प्रकाश, “विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासचिव पांडुरंग राऊत, कार्यकारी संचालक अजित चौगुले यांच्यासह बजरंग सोनवणे, महेश कर्पे, ज्ञानेश्वर नवले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित चौगुले तर चेअरमन महेश देशमुख यांनी आभार मानले.
बायोफ्युएल धोरण
“”सहकारी आणि खासगी असे एकूण 200 साखर कारखाने असलेले महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात अव्वल राज्य आहे. कारखान्यांमध्ये स्पर्धा नसून ते एकमेकांना पूरक आहेत. साखर उद्योग अधिक उंचीवर नेण्यामध्ये या दोघांचा मोलाचा वाटा आहे, असे उत्तम इंदलकर यांनी सांगितले. बायोसीएनजी बायोफ्युएलची भारताची दिवसागणिक मागणी वाढत असून 80 टक्के आयातीवर तर 20 टक्के स्वतः निर्मिती करीत आहोत. बायोफ्युएल धोरणाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे शशी प्रकाश यांनी स्पष्ट केले.