कोल्हापूर – पुढील चार दिवस जिल्ह्यात हाय अलर्ट आहे. नदी पात्राशेजारील गावांसह डोंगरी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भूदरगड या डोंगरभागातील तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होणार असल्यामुळे सर्वांनीच सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा कोल्हापूर मंडळचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांचा अभ्यासकरता वीस ते तीस जुलै दरम्यान अतीवृष्टी होऊन पूराचा धोका होण्याची शक्यता असते. याही वर्षी अशीच स्थिती असणार आहे.
नुकताच आज दुपारी भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढे चार दिवस जिल्ह्यात प्रतिदिन 70 ते 150 पेक्षा अधिक मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ संभवते, डोंगराळ भागात भूसख्खलन, दरड कोसळणे व जुन्या घरांची पडझड होण्याची शक्यता आहे.