मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरणात एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून केवळ “चिथावणीखोर भाषणं करुन लोकांचे प्रश्न मिटणार आहेत का?” अशी विचारणा केली आहे.
शिर्डीमध्ये आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम करतात. कित्येक वर्ष लोक गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत”.
“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा. पण आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगताय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं, वक्तव्यं करायची हे आपल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परडवणारं नाही,” असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान अजान आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात तेढ निर्माण केलं जात असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादांचे पालन करावं, विनाकारण जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.