कोपरगाव – नाशिक येथील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात व तालुक्यातील नदी काठच्या गावांत पाणी शिरले. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की, गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा देण्यात आलेला ईशारा व नदीपात्र सोडून वाहत असलेले गोदावरीचे पाणी पाहून नदीकाठच्या नागरिकांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्कालीन यंत्रणेच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
मात्र महापुराच्या पाण्यामुळे गोदाकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. गोदावरी नदीच्या काठावर असलेली हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. हजारो एकर शेती महापुराच्या पाण्याने बाधित झाली आहे. शेतकऱ्यांनी साचवलेल्या कांद्याच्या चाळीत महापुराचे पाणी गेल्यामुळे या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव शहरात महापुराचे पाणी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे तसेच नागरिकांच्या घरात हे पाणी जाऊन त्यांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील वडगाव, चास, मोर्विस, मंजूर, मायगाव देवी, वेळापूर, सुरेगाव, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, डाऊच तसेच राहाता तालुक्यातील शिंगवे, वारी, पुणतांबा आदी गोदावरी काठच्या गावांतील शेतकऱ्यांना व कोपरगाव शहरातील नागरिकांना व व्यावसायिकांना या महापुराचा मोठा तडाखा बसला आहे. या महापुराने बाधित झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि महापुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या व्यावसायिकांना व नागरिकांना तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी, असे दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.