पाण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची मुख्यसभेत ओरड
पुणे- खडकवासला धरणसाखळीत मान्सूनच्या पावसाने दमदार सलामी दिली असली तरी, शहरातील पाणीपुरवठा चांगलाच विस्कळीत झाला आहे. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्यावरून प्रशासनास घेरले. तसेच “लॉकडाऊनमध्ये पाणी नियमित मिळाले मग आता अनलॉकमध्ये पाणी गेले कुठे’, असा सवाल उपस्थित करत आता आम्ही जलसमाधी घ्यायची का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पाणीपुरवठा करताना अधिकाऱ्यांनी प्रामिणकपणे काम करावे, पाणी वाटपात कोणताही दुजाभाव करू नये अशी मागणीही करणात आली.
महापालिकेची मुख्यसभा सुरू होताच, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसे पाणी आहे. मात्र, त्यानंतरही मध्यवर्ती भागातील रास्तापेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठेत पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी मिळत नाही.
याविषयावर शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, गफूर पठाण, बाबुराव चांदेरे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, सचिन दोडके, मनसेचे वसंत मोरे, हरिदास चरवड, अजय खेडेकर, प्रशांत जगताप आदींनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
पाण्याचे वेळापत्रक नाही. कोंढवा आणि हडपसरसारख्या भागातही पाणी देण्यात येत नाही. समाविष्ट गावांमध्ये पाण्याचे नियोजन नाही. शेतीचे आवर्तन बंद असल्याने कालव्याला पाणी नाही. कालव्याला पाणी सोडले तर विहिरींना पाणी येईल अशी भूमिका नगरसेवक गफूर पठाण, योगेश ससाणे व गणेश ढोरे यांनी घेतली. तर, “वारजे-शिवणे परिसरातील नागरिक भारतातील आहेत, पाकिस्तानातून आलेले नाहीत. पाणीपट्टी घ्या मात्र पाणी समस्या कायमची सोडवा,’ अशी मागणी नगरसेवक दोडके यांनी केली.
उपनगरांची वाईट अवस्था
उपनगरांतल्या नगरसेवकांनी जलसमाधी घ्यायची का? जिथे मध्यवस्तीत पाणी मिळत नाही तेथे उपनगरांची अवस्था किती वाईट असेल याची कल्पना न केलेली बरी. कात्रज गाव पालिकेच्या हद्दीत आल्यापासून आजवर पाणी याच विषयावर पालिकेशी भांडतोय. साठवण क्षमता वाढविण्यात येत आहे, मग नियोजन का होत नाही. टाक्या बांधूनही पाणी मिळत नाही.
भामा आसखेड, खडकवासल्याचे पाणी मुरतेय कुठे? असा सवाल मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी करत तातडीने नियोजन करून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यानंतर प्रशासनाकडून खुलासा करताना, प्रत्येक नगरसेवकांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा करताना दिले.