सिमला – हिमाचलात पुन्हा पावसाने धुमाकूळ सुरू केला आहे. या आधीच्या पावसाचे दोन भीषण तडाखे या राज्याने सोसले आहेत. त्यातून अजून हे राज्य सावरले नसतानाच आता पुन्हा तेथे मुसळधार वृष्टी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिमला आणि त्याच्या लगतच्या भागातील आठ प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
वाहतूक बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये “विक्ट्री टनेल-कैथू रोड, कसुंप्टी-परिमहल रोड, विकासनगर-एसडीए कॉम्प्लेक्स-कसुंप्टी रोड, कानलॉग-सीपीआरआय-बामलो रस्ता, बामलो-टोलॅंड रस्ता, जबलदाजवळील बदराईल येथील टिक्कर-नानखारी रस्ता, या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर मुसळधार पावसाने काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून काहीं ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. हे रस्ते बंद केल्याने तेथील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहेत.
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी गुरुवारी मंडी जिल्ह्यातील कुक्लाह येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना या भागात राहणाऱ्या लोकांसाठी रेशनची व्यवस्था करण्याची विनंती केली. 24 जूनला राज्यात पावसाचे आगमन झाले. त्यात आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोकांचे बळी गेले असून किमान सुमारे दहा हजार कोटी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.