मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी सोमवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.
रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी, राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या भेटीमध्ये चार खासगी रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कोरोना तसेच कोरोना शिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राने घेतलेला हा अभिनव निर्णय अन्य राज्यांनाही प्रेरणादायी ठरला आहे. ८० टक्के खाटा राखीव करूनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जातेय.
यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल घेत काल रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले. यात त्यांनी बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांना भेट देत रुग्णालयांतील एकूण खाटा, ८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा, राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता यांची माहिती घेतली. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका, त्यांना वेळेवर उपचार द्या, शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. काही ठिकाणी बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेड बाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या ५० टक्के खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे अशी विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक, हिंदुजा, लिलावती रूग्णालय यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.