देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची गडबड सध्या सुरू असतानाच काही वृत्तवाहिन्यांनी प्रत्यक्ष मतदानापूर्वी जनमत चाचणीचे काही निष्कर्ष जाहीर केले. या राज्यांत मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीची ही अंतिम मतदार चाचणी होती. यापूर्वी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही या वृत्तवाहिन्यांनी एक जनमत चाचणी घेतली होती. ती जनमत चाचणी आणि गेल्या दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेली जनमत चाचणी यातील निष्कर्ष पाहिले तर त्यामध्ये फारसा फरक दिसत नाही. त्यामुळेच मतदानाला आणखी काही कालावधी बाकी असल्याने या जनमत चाचणीमध्ये ज्या राजकीय पक्षांच्या विरोधातील निष्कर्ष दिसत आहेत ते जागे होतील आणि उरलेल्या दिवसांचा योग्य फायदा करून घेऊन मतदारांपर्यंत आपली भूमिका योग्य प्रकारे पोहोचवतील अशी आशा करायला हवी.
महिनाभराच्या कालावधीत घेण्यात आलेल्या दोन्ही जनमत चाचण्यांवर नजर टाकली, तर उत्तर प्रदेशामध्ये भाजप आपली सत्ता राखणार आहे असाच निष्कर्ष समोर येत आहे. सोबतच गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या राज्यांची निवडणूक होणार असली तरी संपूर्ण देशाचे लक्ष निश्चितच उत्तर प्रदेशच्या निकालावरच राहणार आहे. अर्थात उत्तर प्रदेशबाबतीतील निष्कर्ष भाजपला दिलासा देणारे असले, तरी इतर काही राज्यांतील भाजपच्या कामगिरीबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे हे निश्चित. ज्या राज्यांमध्ये सध्या भाजप सत्तेवर आहे त्या राज्यांपैकी गोवा, उत्तराखंड या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला झगडावे लागणार आहे, तर पंजाबमध्ये पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे, अशी ही जनमत चाचणी सांगते.
मणिपूरमध्ये मात्र भाजप उत्तर प्रदेशप्रमाणे पुन्हा सत्ता स्थापन करू शकते; पण गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये मात्र भाजपला झगडावे लागणार आहे, हा संदेश या जनमत चाचणीतून मिळत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा भाजपला उत्तर प्रदेशात मिळाल्या होत्या तेवढ्या जागा राखणे भाजपाला शक्य होणार नाही हासुद्धा अर्थ या जनमत चाचणीतून स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या पहिल्या कारकिर्दीपेक्षा दुसऱ्या कारकिर्दीमध्ये जास्त जागा मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते; पण तशा प्रकारचे आश्चर्य उत्तर प्रदेशमध्ये देता येणार नाही असेच संकेत या जनमत चाचणीवरून मिळत आहेत. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची कामगिरी कशी असेल याचे संकेतही या जनमत चाचणीने दिले आहेत.
खरे तर गोव्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने चांगली कामगिरी करूनही त्यांना सत्ता मिळवता आली नव्हती. यावेळीसुद्धा सर्वात जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. या राज्यामध्येही भाजप आणि कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर होण्याची लक्षणे दिसत असतानाच आम आदमी पक्षाची कामगिरी मात्र महत्त्वाची आणि निर्णायक ठरण्याचे संकेतही मिळत आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकांत ज्या राज्यांमध्ये आपने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात सर्वच राज्यांमध्ये आप ला पूर्वीपेक्षा जास्त चांगली कामगिरी करता येणार आहे. सर्वात आश्चर्यकारक निष्कर्ष हाच आहे की, पंजाबमध्ये आप ला सत्ता मिळू शकते. पंजाबमधील कॉंग्रेस सरकारला बाजूला करून तेथे आप चे सरकार येईल, असा निष्कर्ष जर या जनमत चाचणीमध्ये समोर आला असेल तर तो निश्चितच धक्कादायक मानावा लागेल. अर्थात, छोट्या राज्यांमध्ये सत्ता काबीज करणे याच धोरणाने आम आदमी पक्ष काम करत असल्याने पंजाबमधील जनतेला एक वेगळा पर्याय समोर दिसत असल्याने ही जनमत चाचणी खरीसुद्धा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंजाब आणि गोव्यात कॉंग्रेसची जरी बऱ्यापैकी चांगली कामगिरी होणार असली तरी इतर राज्यांमध्ये कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणावर झगडावे लागणार आहे. उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कॉंग्रेसचे लक्षणीय अस्तित्व आहे. या अस्तित्वाला जर आम आदमी पक्षासारखा नवीन पक्ष धक्का पोहोचवत असेल तर कॉंग्रेसने आपले कुठे चुकते हे लक्षात घेण्याची हीच वेळ आहे. दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्षाने कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बाजूला सारून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याच प्रकारे धोरणावर काम करून जर कॉंग्रेस आणि भाजप यांना पर्याय म्हणून विविध छोट्या राज्यांमध्ये आम आदमी पक्ष समोर येत असेल तर ती गोष्ट निश्चितच महत्त्वाची मानावी लागेल. गोव्यासारख्या राज्यांमध्येही आपच्या वाट्याला आठ ते दहा जागा येतील, असे निष्कर्ष या जनमत चाचणीतून समोर आले आहेत.
गोवा राज्यात नेहमीच सत्तेचा लंबक इकडून तिकडे फिरत असल्यामुळे या राज्यांमध्येही जेवढ्या जागा आम आदमी जिंकेल त्या जागा सत्ता स्थापन करण्यासाठी निश्चितच महत्त्वाच्या ठरणार आहेत. वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या जनमत चाचणीबाबत नेहमीच आक्षेप घेतला जातो आणि संशय उपस्थित केला जातो ज्याच्या बाजूने जनमत चाचणीचे निष्कर्ष असतात ते याबाबत टीका करत नाहीत; पण ज्यांच्या विरोधात ते निष्कर्ष जातात ते मात्र या चाचण्या चुकीच्या असल्याची भूमिका घेतात. भाजपची कामगिरी जर पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर पक्षाच्या धोरणामध्ये आणि सरकार चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी चुकत आहे हा धडाही या निमित्ताने सत्ताधारी भाजपने घेण्याची गरज आहे. या चाचण्यांचे निष्कर्ष गांभीर्याने घेऊन जर आपल्या भूमिकेमध्ये आणि कामगिरीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय कॉंग्रेस आणि भाजपा या सारख्या पक्षांनी घेतला नाही तर मतदारांसमोर आम आदमी पक्षासारखा एक पर्याय निर्माण होत आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या जनमत चाचणीतून हाच मोठा धडा राजकीय पक्षांना मिळाला आहे.