देशातील सर्वात जुना आणि मोठा राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे सदस्य अभियान 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्ष संघटनेतर्फे कॉंग्रेसचा सदस्य होण्यासाठी ज्या अनेक नियमांची घोषणा केली आहे ते नियम निश्चितच महत्त्वाचे आहेत. या नव्या नियमांप्रमाणे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला दारू आणि अंमली पदार्थांपासून दूर राहावे लागणार आहे तसेच पक्ष संघटनेवर जाहीरपणे टीका करता येणार नाही.
आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने पक्षाचे सदस्यत्व देण्यासाठी दारू आणि अंमली पदार्थापासून दूर राहावे, असे लेखी वचन घेतलेले नाही. पण कॉंग्रेसने अशा प्रकारचा पायंडा सुरू केला आहे, ही खरोखरच अभिनंदनाची बाब आहे. या महत्त्वाच्या नियमाव्यतिरिक्त इतरही काही नियमांचे पालन कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला करावे लागणार आहे. कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मालमत्ता न मिळवणे किंवा खादीचे कपडे वापरण्याची सवय करणे आणि समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे,
अशा प्रकारचे काही नियम पक्षाचे नवीन सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांना सांगण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नियम मला मान्य आहेत, असे लेखी लिहून देणाऱ्यालाच आता पक्षाचे सदस्यत्व दिले जाणार आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय राजकारणामध्ये नेहमीच निवडणुकीचे राजकारण महत्त्वाचे ठरते आणि या निवडणुकीच्या राजकारणामध्ये पैसा हा महत्त्वाचा असतो आणि निवडणुकीच्या कालावधीमध्येच सामान्य कार्यकर्त्यांना ज्याप्रकारे पैसा,मद्य आणि इतर गोष्टींचे वाटप केले जाते ती गोष्टही आता दडून राहिलेली नाही.
निवडणुकीच्या काळात जरी दारू बंदी असली तरी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर मद्याच्या नद्या वाहत असतात. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या माध्यमातूनच अशा गोष्टी केल्या जातात ज्यामुळे आपल्याला निवडणुकीत यश मिळेल, असा एक भ्रम तयार होतो. त्यामुळेच कॉंग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे सदस्य स्वीकारणाऱ्यांनाच दारू आणि अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे सांगितले असल्याने ही महत्त्वाची घडामोड मानावी लागणार आहे.
इतर सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारचे नियम तयार केले तर निवडणुकीच्या काळात मद्य आणि इतर अनिष्ट गोष्टींसाठी जो करोडो रुपयांचा चुराडा केला जातो त्याचे प्रमाण कमी होईल. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळातही आसपासच्या परिसरातील धाबे किंवा हॉटेल्स बुक करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सर्व प्रकारच्या सोयी केल्या जातात ही गोष्टही भारतीय राजकारणाला नवीन राहिलेली नाही.
निवडणुकीच्या काळात काही दिवस किमान खाण्याची आणि पिण्याची सोय होते म्हणूनच राजकीय पक्षांची जवळीक साधणारे कार्यकर्ते या देशात काही कमी नाहीत. भारतात सतत कोणती ना कोणती निवडणूक होत असल्याने त्या निमित्ताने आपली सोय पाहण्यासाठी अनेक तथाकथित कार्यकर्ते निवडणुकीच्या राजकारणात उतरलेले असतात. निवडणुकीच्या काळात तणावाची परिस्थिती निर्माण होते किंवा हिंसाचार होतो त्यालाही मोठ्या प्रमाणावरील मद्यपान आणि इतर गोष्टी कारणीभूत असतात हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने तयार केलेल्या या नियमाकडे पाहावे लागेल. अर्थात पक्षाचे नव्याने सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांसाठी हा नियम असला तरी पक्षाचे दीर्घकाळासाठी सदस्य असणाऱ्यांनीही या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा निश्चितच पक्ष संघटनेने बाळगली असावी. पुढील वर्षाच्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची, इतर पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याने पक्षाने आतापासूनच सदस्य अभियानाला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने हा एक नवा पायंडा पक्षाने पाडला आहे आणि निश्चितच त्याचा विचार इतर राजकीय पक्षांनाही करावा लागेल.
देशात जे विविध राजकीय पक्ष कार्यरत आहेत त्या सर्व पक्षांचे राजकीय धोरण, विचारसरणी आणि आदर्श सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट पक्षाची सदस्य होते तेव्हा त्याला त्या पक्षाची ध्येय धोरणे आणि आदर्श माहीत असतात, असे गृहीत धरले जाते. कॉंग्रेस पक्षाला शंभर वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास असल्याने कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि आदर्श सर्वांनाच माहीत आहेत. म्हणूनच पक्ष संघटनेची जुळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी कॉंग्रेस पक्षाने ही जी नियमावली केली आहे ती निश्चितच आदर्श आहे आणि ती संपूर्णपणे अमलात आली तर कॉंग्रेस पक्ष संघटनेला निश्चितच एक चांगले वळण मिळणार आहे.
सदस्य होऊ पाहणाऱ्या व्यक्तीने खादीचा वापर सहजपणे करायला हवा अशी अपेक्षा पक्ष संघटनेने व्यक्त केली आहे प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांमधील राजकारणी नेत्यांचे विशेषत: कॉंग्रेस नेत्यांचेही पेहराव पाहिले तर खादीचे कपडे किंवा डोक्यावरील गांधीटोपीचे प्रमाण खूप प्रमाणात कमी झाले आहे. फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा एक मे यासारख्या कार्यक्रमांमध्ये कॉंग्रेसचे नेते खादी परिधान करून डोक्यावर गांधी टोपी चढवतात. खादीच्या पेहरावापेक्षाही सुटबुटातील राजकारण्यांचे प्रमाण वाढले आहे. पण कॉंग्रेस पक्षच नव्हे तर देशातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि काही वरिष्ठ कार्यकर्ते यांनी जर खादीचा स्वीकार केला
तर देशातील एका मोठ्या ग्राम उद्योगाला चालना देण्याचे कामही होणार आहे. तरुण पिढीला कॉंग्रेस पक्ष संघटनेशी जोडण्याचे काम या अभियानात करण्यात येणार असले, तरी या नियमांच्या पार्श्वभूमीवर खऱ्याखुऱ्या पद्धतीने हे नियम अमलात आणण्याचे गांभीर्य असणाऱ्या तरुणांनाच पक्ष संघटनेमध्ये आणण्याचे आव्हान आता कॉंग्रेसला पेलावे लागणार आहे. कारण केवळ कॉंग्रेसचे सदस्यत्व मिळते म्हणून पक्षाने तयार केलेले सर्व नियम मला मान्य आहेत,
असे तोंडदेखले सांगून एखादी व्यक्ती पक्षात आली आणि नंतर एखादी समस्या झाली तर त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होणार आहे. केवळ या नियमांचे पालन करण्यास संमती दर्शवली म्हणून पक्षात प्रवेश देण्यात येणार असला तरी त्यानंतरही त्यांच्या एकूण वागणुकीवर कशाप्रकारे नियंत्रण ठेवायचे याचाही विचार आता फक्त संघटनेला करावा लागणार आहे.
आधुनिक काळातील राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जमान्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने ही आदर्श नियमावली तयार करून एक वेगळी वाट निर्माण केली आहे. देशातील इतर राजकीय पक्षही या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा करूया.