गेल्या वर्षी चीनच्या वुहान प्रांतातून आलेल्या करोना विषाणू संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातला. आरोग्यप्रणाली आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडली. जगाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला. मार्च 2020 मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेनंतर 2021 मध्ये दुसरी लाट पाहावयास मिळाली. आता जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी मास्क घालणे अनिवार्यच ठेवले आहे.
कारण गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन नावाचा नवीन व्हेरिएंट आल्याने लोकांची पुन्हा झोप उडाली आहे. आजघडीला तो 70 देशांत पसरला असून भारतात देखील त्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. आतापर्यंत भारतात 50 च्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. नवी दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, चंदिगड, केरळ, महाराष्ट्र आणि राजस्थान येथे नवीन व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.
जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य तज्ज्ञ मंडळींनी या नवीन व्हेरिएंटवरून इशारे दिले आहेत. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरत असून त्याला रोखण्यासाठी बूस्टर डोस देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार, बूस्टर डोस दिल्यास अँटीबॉडीत पुरेशी वाढ होईल आणि त्याचा प्रभाव 71 ते 75 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अनेक देशांनी याचे महत्त्व ओळखून बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.
यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे बूस्टर डोस घेतानाचे फोटो व्हायरलही झाले; परंतु भारताच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास आरोग्य यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, देशातील नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत राष्ट्रीय सल्लागारांशी, तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. बूस्टर डोसमुळे लाभ दिल्याचे पुरावे अद्याप मिळाले नसल्याचा आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे.
केंद्रीय औषध नियामक समितीशी संलग्न असलेल्या तज्ज्ञांच्या समितीने म्हटले की, क्लिनिकल चाचणीशिवाय बूस्टर डोस देण्याची शिफारस करता येणार नाही. सीरमने बूस्टर डोस देण्याबाबत अर्ज केला असून त्यावर तज्ज्ञांचा गट विचार करत आहे. प्रश्न असा की, ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत तीन पट अधिक वेगाने पसरत असताना आपण लोकांचा जीव धोक्यात का घालायचा? प्रचारसभा, उद्घाटने, धार्मिक कार्यक्रम, प्रचारफेरी, पदयात्रा, मेळाव्यात गर्दी जमवणाऱ्या भाजप, कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना ओमायक्रॉन पसरणार नाही असे वाटत आहे काय?
सद्यस्थितीत देशात कोट्यवधी डोस वापराविना पडून असून त्याची कालमर्यादा देखील संपत आली आहे. ज्यांना ऐच्छिक पातळीवर बूस्टर डोस हवा आहे, त्यांना ही लस का दिली जात नाही? भारतीय नागरिक टास्क फोर्सच्या शिफारशींचे किंवा सूचनांचे उल्लंघन करत असल्याचे सांगितले जात आहे. ते खुलेआम बाहेर जात आहेत. कुटुंबांना, मित्रांना, नातेवाइकांना भेटत आहेत. वीकएंडला फिरायला जात आहेत. बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. हॉटेलमध्ये बसायला जागा मिळत नाही, सामाजिक अंतर पाळण्याचे नियम एकप्रकारे कालबाह्य झाले आहेत. विना मास्क फिरण्याचा ट्रेंडच आला आहे,
विमानतळावर देखील गर्दी पाहावयास मिळत आहे. जोखीम असलेल्या देशातून आलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर करावी लागत आहे. जोपर्यंत रिपोर्ट हाती पडत नाही, तापेर्यंत त्यांना विमानतळावरून हलता येत नाही. त्यांना सहा-सहा तास रिपोर्टची वाट पाहावी लागत आहे. हे आवश्यक असले तरी विमानतळावर सामाजिक अंतर पाळण्याचे भान कोणालाच राहिलेले नाही. अशा स्थितीत करोनाचे नियम पाळण्याबाबत उदासीनता वाढणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन संसर्गासंदर्भात लोकांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवणे गरजेचे आहे.
अन्यथा लोक तज्ज्ञ मंडळींना नावे ठेवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. आज नवीन व्हेरिएंट कसा असेल हे तज्ज्ञांनाच माहीत नसेल तर ते आम्हाला काय सांगणार, असे काही जण म्हणत आहेत. यामुळे वास्तव आणि विज्ञान यासंदर्भात लोकांत संभ्रम निर्माण होत आहे. आपल्याला दुसऱ्या लाटेची स्थिती परत आणायची नाहीये. दुसऱ्या लाटेने देशाची झालेली बिकट स्थिती संपूर्ण जगाने पाहिली. नेत्यांना आणि धोरणकर्त्यांना दुसऱ्या लाटेचा सामना करता करता नाकीनऊ आले होते. निष्काळजीपणा, नोकरशाहीची बेपवाई, अहंकार यामुळे दुसरी लाट प्रारंभीच्या पायरीवर थोपवता आली नाही. परिणामी संपूर्ण देशच दुसऱ्या लाटेला शरण गेला.
विशेष म्हणजे जानेवारीतच करोनावर मात केल्याचा गाजावाजा करण्यात आला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. आतापर्यंत भारतात 55 टक्के प्रौढ लोकसंख्येचे पूर्ण आणि 21 टक्के आंशिक लसीकरण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, लसीने आजाराचे गांभीर्य कमी करता येणे शक्य आहे आणि लोकांना दवाखान्यात जाण्यापासून वाचवता येईल. शेवटी ज्या मंडळींनी आतापर्यंत लस घेतलेली नाही, त्यांना लस देणे गरजेचे आहे. तसेच वयस्कर मंडळींना बूस्टर डोस देण्याबाबत विचार करायला हवा. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या मते, भारतात तिसरी लाट ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणे भयावह ठरणार नाही.
काळानुसार करोना संसर्गाची तीव्रता कमी होत असून त्याचे गांभीर्य देखील कमी होऊ लागले आहे. परंतु प्रत्यक्षात असे चित्र आहे का? गुलेरियांचे म्हणणे खरेच ठरेल असे मानून आपण बिनधास्तपणाने वावरणे योग्य आहे का? कारण अनेकांना गुलेरिया यांचे मत मान्य नाही. ते खासगी रुग्णालयात कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचा बूस्टर डोस घेत आहेत. जी मंडळी श्रीमंत आहेत, ते दुबई, लंडन आणि अन्य ठिकाणी जाऊन बूस्टर डोस घेत आहेत. देशातील नागरिक दुसऱ्या लाटेसारख्या स्थितीत पुन्हा ढकलले जाणार नाहीत, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. अन्यथा आपण लसीकरणाच्या लाभापासून वंचित राहू शकतो.
संपूर्ण देशभरातील शाळा सुरू होत आहेत आणि त्यामुळे मुलांच्या माध्यमातून करोनाची लाट येऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. वास्तविक सरकारकडून बूस्टर डोस अभियान कधी सुरू होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ओमायक्रॉन संसर्गाचा स्वभाव पाहता जर बूस्टर डोस दिला नाही किंवा लस दिली नाही तर बाधित नसलेला प्रत्येक व्यक्ती हा त्याचा म्यूटंट होईल.
त्यामुळे आतापर्यंत करोना रोखण्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे, ती पाण्यात जाईल. सरकारने लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याकडे लक्ष द्यायला हवे. आपण एका नव्या दिवसाकडे वाटचाल करत आहेत आणि तेथे औदासीन्यला जागा नाही. अमेरिकी गायक केनी रोजर याचे एक गाणे आहे. “इफ यू आर गोना प्ले द गेम, यू गो टू लर्न टू प्ले इट राइट’. भारतालादेखील योग्य रणनीती आखावी लागेल.