बारामती (प्रतिनिधी) – राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याचे कृषी, सहकार व पणन मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेणार असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर याबाबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले .
महा ऑर्गेनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन(मोर्फा) चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे व सचिव प्रल्हाद वरे यांनी ही माहिती दिली. (दि. २) रोजी बारामती येथे गोविंदबागेत शरद पवार यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेती बाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पवार यांनी वरिल निर्णय घेतल्याचे पडवळे व वरे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सतिश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित आवर्जून उपस्थित होते. बैठकीस सदाशिव सातव, मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, संचालक अमरजित जगताप, विजय तावरे, रोहित अहिवळे उपस्थित होते.
राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेतीला मोठा वाव असून त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण बनावे व सेंद्रिय, विषमुक्त शेती मालाला किफायतशीर मार्केट मिळावे याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा याबाबतचे सविस्तर सादरीकरण बैठकीत मोर्फा चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी केले.
सेंद्रिय व विषमुक्त उत्पादनांच्या मार्केटिंग साठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भुमिका असून सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासात तिन्हीही विभागाची मदत घेऊन सेंद्रिय शेतीचे नविन धोरण बनविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.
मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
“सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी राज्यात करित आहेत. पण त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये अशा उत्पादना बाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम राज्य सरकारने करावे अशी मागणी यावेळी शरद पवार यांच्या कडे करण्यात आली.