पिंपरी (प्रतिनिधी) – निम्मा पावसाळा उलटून गेल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाला “रेन वॉटर हार्व्हेस्टिंग’ची आठवण झाली आहे. आपल्या बेजबाबदार आणि गलथान कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थापत्य विभागाने चिंचवडगावातील भूमिगत जलवाहिनीवरच बोअरवेल खोदल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तर या परिसराचा पाणी पुरवठाही विस्कळीत झाला. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
शहरात असलेल्या विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बोअरवेल खोदण्याचे काम महापालिकेकडून सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. चिंचवड गावातील चापेकर चौक ते अहिंसा चौक (एल्पो चौक) दरम्यान हिंदूस्थान बेकरीजवळ महापालिकेने शनिवारी दोन ठिकाणी बोअरवेल खोदल्या. बोअरवेल खोदताना त्या ठिकाणाहून जलवाहिनी किंवा विद्युत वाहिनी गेली आहे की नाही, याबाबत खातरजमा केली नाही. त्यामुळे येथील जलवाहिनीवरच महापालिकेने शनिवारी बोअरवेल खोदण्यात आली.
रविवारी सकाळी चिंचवडगाव परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आले. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. चापेकर चौकाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. ही बाब लक्षात येताच पाणी पुरवठा विभागाने येथील जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद केला. तसेच तातडीने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र या प्रकारामुळे स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठी अवघ्या 34 टक्क्यांवर आला आहे. गेल्या दहा वर्षांतील हा सर्वात निच्चांकी पाणीसाठा आहे. यामुळे शहरवासियांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
ज्या भागात बोअरवेल प्रमाणे खड्डा खोदला आहे त्या ठिकाणी सखोल भाग असून पावसाचे पाणी साचते. ते पाणी साचू नये म्हणून तो खड्डा खोदला होता. काम करताना पाण्याच्या जलवाहिनीला मशिन घासून गेल्याने जलवाहिनी फुटली. मात्र आता ती जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली आहे. हे काम करताना खालून कोणती लाइन गेली आहे याची माहिती अधिकाऱ्याने घेतलेली नव्हती.
रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग
रस्त्यावर बोअरवेल खोदण्यापूर्वी स्थापत्य विभागाने तीन ते चार फूट मशिन ऐवजी हाताने खोदकाम केले असते, तर त्या ठिकाणी असलेली जलवाहिनी दिसून आली असती. सुदैवाने त्या ठिकाणी जलवाहिनी होती. जर भूमिगत उच्चदाब विद्युतवाहिनी असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
– सुनील अहिरे, अभियंता पाणी पुरवठा विभाग