नवी दिल्ली – पती-पत्नीच्या वादात न्यायालयाने दिलेले निर्णय अनेकदा चर्चाचा विषय ठरतात. पाटना न्यायालयातून असाच एक मजेशीर निर्णय समोर आला आहे. एक व्यक्ती न्यायालयात आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी गेला होता. मात्र न्यायालयाने त्याला अजब सल्ला देऊन परत पाठवले आहे.
आपली पत्नी कोणासोबत तरी पळून गेली, यासाठी पतीने कोर्टात धाव घेतली होती. तक्रारदार पतीबरोबरच आरोपीदेखील न्यायाधीशांसमोर उभा होता. मात्र त्याला शिक्षा देण्याऐवजी कोर्टाने आरोपीला जामीन मंजुर केला. मात्र त्यानंतर पीडित पतीला न्यायाधीशांनी दिलेला सल्ला चर्चेत आला आहे. न्यायाधीश म्हणाले की, तुमची पत्नी कोणा दुसऱ्यासोबत पळून गेली असेल तर तिला विसरून जा. दुसरी मुलगी शोधा. जी पळून गेली ती आता तुमची कुठे राहिली ?
पीडित पतीचं नाव नागेंद्र कुमार जैस्वाल (25 वर्षे) असून त्याचं लग्न 30 नोव्हेंबर 2017 मध्ये तान्या उर्फ मधुसोबत झालं होतं. सुरुवातीला मधू आपल्या सासरी राहत होती, मात्र त्यानंतर तिने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा पतीसमोर व्यक्त केली. पतीने देखील मधुला दरभंगातील एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.
दरम्यान लॉकडाऊनमध्ये मधू आपल्या माहेरी काकासोबत राहू लागली. त्यात एकेदिवशी ती काकाच्या घरातून गायब झाली. शोध घेतल्यानंतर ती राजेश कुमारसोबत पळून गेल्याचे समोर आले. पतीच्या एफआयआरनंतर पोलिसांनी राजेश कुमारला अटक केली आणि कोर्टात हजर केलं. येथे न्यायाधीश पी.के. झा यांनी त्याला जामीन मंजूर केला. तर पतीला दुसरी मुलगी शोधण्याचा सल्ला दिला.