मुंबई : शिंदे गटाचे सतत चर्चेत राहणारे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दीपक केसरकर बोलत होते. या प्रसंगी, “या प्रकरणी गृहमंत्रालय योग्य ती कारवाई करेल. आमच्यासाठी खासदार, आमदार आणि सर्वसामान्य नागरीक सारखेच आहेत. संतोष बांगर यांनी थोडा संयम राखला पाहिजे. ते हे एका पक्षाचे आमदार आहेत. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, हे मला मान्य आहे. आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू”, असे स्पष्ट मत यावेळी केसरकर यांनी नोंदवले.
पुढे बोलताना त्यांनी, “संतोष बांगर हे आक्रमक आमदार आहेत. ते जे काही करतात, त्यांच्यामागे एक कारण असते. मागे एकदा शालेय पोषण आहारात अळ्या साडपल्या होत्या. तेव्हा त्यांनी अशा प्रकारं वर्तन केलं होतं. आताही अशाच प्रकारे काही तरी कारण असेल. मात्र, कारण कोणतंही असो, अशा प्रकारे कोणाला मारहारण होता कामा नये. यासाठी कायदा आहे”, असेही ते म्हणाले.
आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. महत्त्वाचे म्हणजे बांगर यांच्याबरोबच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही याप्राचार्यांना मारहाण करताना या व्हिडीओतून दिसून येत आहे.