नवी दिल्ली – देशातील एकही पात्र नागरिक कोविड प्रतिबंधक लसीच्या संरक्षक कवचापासून वंचित राहू नये. यासाठी विविध सहभागींचे एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार याही उपस्थित होत्या. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह केरळ, कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश झारखंड यासह इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
सद्यस्थितीला देशातील लोकसंख्येपैकी 79 टक्के प्रौढांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्र तर 38 टक्के प्रौढांनी या लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. “हर घर दस्तक’ अभियानाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी आखलेल्या धोरणानुसार गावांमध्ये आधीच “प्रचार पथकांची’ नियुक्ती करण्यात यावी. गावागावांमधून लसीकरणासाठी जनजागृती करण्यात यावी आणि त्यानंतर “लसीकरण पथक’ त्या गावातील पात्र नागरिकांना लसीची पहिली आणि दुसरी मात्रा देईल, याची काळजी घेण्याची सूचना त्यानी केली. संपूर्ण लसीकरणाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी मुलांची मदत घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
बस स्थानके, रेल्वे स्थानके, विशेषतः महानगरांतील अशा गर्दीच्या ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सुरू करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. “हर घर दस्तक’ अभियानातील प्रत्येक दिवस लाभार्थ्यांच्या विविध गटांना लस घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी समर्पित करायला हवा. एक दिवस व्यापाऱ्यांसाठी, एक दिवस फिरत्या विक्रेत्यांसाठी, किरकोळ विक्रेत्यांसाठी, दुकानदारांसाठी समर्पित करता येऊ शकेल, इतर दिवशी आपण रिक्षा ओढणारे आणि वाहन चालक अशांसाठी ठेवू शकतो तर एक दिवस मजूर आणि शेतकऱ्यांसाठी राखून ठेवता येईल. असे त्यांनी पुढे सांगितले.