पुणे -देशविकासात अमूल्य योगदान देणारी एक मोठी यंत्रणा म्हणजे आपली रेल्वे. याच रेल्वेने दि. 16 एप्रिल रोजी 170 वर्षे पूर्ण केली. हा कालखंड मोजायचा झाल्यास सुमारे पाच-सहा पिढ्यांच्या प्रगतीची साक्षीदार राहिलेली रेल्वे जगभरात भारतीय तंत्रज्ञानाचा झेंडा मिरवत आहे. याच रेल्वेच्या गौरवास्पद वाटचालीचा हा आढावा…
इंग्रजांच्या काळापासून भारतात ट्रेन सुरू झाली. खरं तर, भारतात पहिल्यांदा 1832 मध्ये ट्रेन चालवण्याची कल्पना आली. त्यावेळी ब्रिटनमध्येही रेल्वे बस सुरू झाली होती. भारतासारख्या देशात रेल्वे चालवल्याचा खूप फायदा होईल हे इंग्रजांना समजले होते. त्यानंतर 1844 मध्ये भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंज या कामात मनापासून सहभागी झाले. यानंतर ब्रिटीशांनी ट्रेन भारतात आणण्यासाठी “ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी’ आणि “ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ या दोन कंपन्या स्थापन केल्या. त्यानंतर देशात रेल्वेचे काम आणखी वेगाने सुरू झाले.
पहिली ट्रेन कधी धावली?
भारतात जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. त्यांनीच जीआयपी अर्थात ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेच्या संचालकपदावर राहून भारतात पहिली रेल्वे आणली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतात मुंबई ते ठाणे या मार्गावर देशात पहिली रेल्वे धावली. ही गाडी 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईहून दुपारी 3.35 वाजता सुटून ठाण्यात 4.45 वाजता पोहोचली. सुमारे 35 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 1 तास 10 मिनिटे लागली. भारताच्या या पहिल्या ट्रेनमध्ये 3 इंजिन आणि 14 डबे होते. ज्यामध्ये सुमारे 400 लोकांनी प्रवास केला. या ट्रेनला 21 तोफांची सलामी देऊन रवाना करण्यात आले. या दिवशी ब्रिटिशांनी सार्वजनिक सुट्टी दिली, त्यामुळे ट्रेन पाहणाऱ्या लोकांची गर्दी ट्रॅकभोवती जमली. सन 1924 पासून भारतात दरवर्षी या रेल्वेच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येवू लागला. तो 2017 पासून पुन्हा एकत्र करण्यात आला.
भारतीय रेल्वे दृष्टिक्षेपात
दररोज सुमारे 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालवाहतूक
मालकीचे 12,147 इंजिन, 75 हजार प्रवासी डबे आणि 289,185 वॅगन्स.
8,702 प्रवासी ट्रेन्ससह एकूण 13,523 ट्रेन दररोज धावतात.
300 रेल्वे यार्ड, 2,300 मालधक्के आणि 700 दुरुस्ती केंद्र
सुमारे 70 हजार कि.मी.चे रेल्वे ट्रॅक
वेगवान वाटचाल
आजच्या काळात, भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. या रेल्वेमुळे देश जोडला गेला. दळणवळण वेगाने झाले. शहरे, प्रांत, राज्य आणि देशाची एकात्मता जोडण्याचे मोठे कार्य या रेल्वेच्या यंत्रणेने केले आहे. इतिहास पाहिला, तर रेल्वेने वेळोवेळी कात टाकली आहे. जग बदलत गेले त्याप्रमाणे भारतीय रेल्वेतही सुधारणा होत गेल्या. सध्या लोकल, प्रवासी, मालगाडी, शताब्दी, गरीबरथ, तेजस, वंदे भारत आणि भविष्यात बुलेट ट्रेनही धावणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या जोरावर आपला देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कमपणे समोर येत आहे.